गंभीर विषयांवर चिमुकल्यांचा कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 00:21 IST2016-02-14T00:11:13+5:302016-02-14T00:21:21+5:30
सावाना : बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन

गंभीर विषयांवर चिमुकल्यांचा कलाविष्कार
नाशिक : अपंग मुलांच्या आई-वडिलांच्या व्यथेपासून ते शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांपर्यंत अनेक गंभीर विषयांची हाताळणी चिमुकल्यांनी केली व आपल्यातील अभिनयकलेचे दर्शन घडवले.
निमित्त होते सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन साने गुरुजी कथामालेअंतर्गत आयोजित कै. रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेचे. स्पर्धेत आज अभिनव आदर्श मराठी शाळेच्या वतीने ‘सुटका’ हे बालनाट्य सादर झाले. त्यात प्रांजल गांगुर्डे, ऋषिकेश पर्वतीकर, तेजस उदावंत, अक्षता जाधव आदिंच्या भूमिका होत्या. नवरचना विद्यालयाच्या वतीने ‘हरित संवर्धन’ नाटक सादर झाले. पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयाच्या वतीने ‘एका आयुष्याची चित्तरकथा’ या नाटकातून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांवर प्रकाश टाकण्यात आला. शिवानी व्यवहारे, वृषाली ठाकरे, हर्षदा वाईकर, नेहा वाळुंज, प्रांजल निकुंभ यांच्या भूमिका होत्या. श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडिअम स्कूलच्या वतीने ‘नवे गोकुळ’ नाटक सादर झाले. त्यात अर्णव दाणी, देवेश डोंगरे, तुषार हिरे, ओंकार गांधिले यांनी भूमिका केल्या. याशिवाय नाशिकरोडच्या सुनंदा केले विद्यालयाच्या वतीने ‘गई बोल रे धिना’, प्रबोधिनी विद्यामंदिराच्या वतीने ‘शहाणपण देगा देवा’, के. के. वाघ इंग्लिश स्कूलच्या वतीने ‘बालदिन’, तर आर. एम. ग्रुपच्या वतीने ‘बब्बी आणि बिम्म’ ही नाटके सादर झाली. उद्या (दि. १४) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आठ नाटके सादर होतील. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते तथा स्पर्धेचे परीक्षक आनंद बापट, डॉ. आश्लेषा कुलकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेश महाजन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बालभवन प्रमुख गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आशा कुलकर्णी, प्रकाश वैद्य उपस्थित होते.