चौकांपेक्षा मंडळांना द्यावा बंदोबस्त
By Admin | Updated: September 4, 2016 00:49 IST2016-09-04T00:49:04+5:302016-09-04T00:49:29+5:30
गृहरक्षक दलाकडून अपेक्षा : गणेश मंडळांची मागणी

चौकांपेक्षा मंडळांना द्यावा बंदोबस्त
नाशिकरोड : भरदिवसा गरज नसताना बंदोबस्तावर वायफळ खर्च करण्यापेक्षा रात्रीच्या काळात सार्वजनिक मंडळाच्या मंडपाजवळ बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी मंडळाकडून केली जात आहे.
गणेशोत्सव काळात
पोलिसांसमवेत गृहरक्षक दलाच्या जवानांची बंदोबस्ताकरिता मदत घेतली जाते. बंदोबस्ताकामी गृहरक्षक दलाच्या जवानांना ३०० ते ४०० प्रतिदिन मानधन दिले जाते. सार्वजनिक मंडळे व हमरस्ते, मुख्य चौकात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त लावला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेताना प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक तसेच दहा दिवस दररोज कोण राहणार यांची सर्व माहिती घेतली जाते. गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करण्याची जशी मंडळाची व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. तशी उत्सव शांततेत साजरा व्हावा व कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी याची सर्वाधिक जबाबदारी पोलीस खात्याची आहे.
रात्रीचा बंदोबस्त द्यावा
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पहिले तीन-चार दिवस आरास, देखावे पूर्ण करण्याचेच काम सुरू असते. तर देखावे, आरास बघण्यासाठी अखेरचे तीन-चार दिवसच गर्दी होत असते. सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंतच आरास-देखावे बघण्यासाठी खुले राहतात.त्यानंतर मंडळाकडून मंडप, देखावे बंद करून घेतले जातात. त्यामुळे भर लोकवस्तीत मंडपाजवळ दिवसा बंदोबस्ताची तितकी गरज नसते. टवाळखोरांकडून सायंकाळी देखावे बघण्यास गर्दी झाल्यावर छेडछाड केली जाते. तर भुरटे चोर, मद्यपी यांचा उपद्रव सहसा रात्रीच होतो. पोलीस प्रशासन मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने असलेल्या मूर्ती, मंडपाजवळच २४ तास बंदोबस्त देतात. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळाच्या मंडपाजवळ सायंकाळपासुन संपूर्ण रात्रभर बंदोबस्त देण्याची खरी गरज
आहे. रात्रीच्या वेळी ‘खाकी’धारकांच्या उपस्थितीमुळे अनेक उपद्रवांना आळा बसतो. गरज नसतांना भरदिवसा लोकवस्तीत बंद मंडपाजवळ बंदोबस्त लावण्यापेक्षा रात्रीच्या वेळी बंदोबस्त ठेवावा अशी मागणी गणेशोत्सव मंडळ व कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)