दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली
By Admin | Updated: September 6, 2016 00:43 IST2016-09-06T00:42:27+5:302016-09-06T00:43:26+5:30
लोकवर्गणीतून काम : हरणबारी उजव्या कालव्याच्या खोलीकरणाचा परिणाम

दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली
जायखेडा : सोमपूर गावाजवळ हरणबारी उजव्या कालव्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने सहा गावातील दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक डॉ. तुषार शेवाळे व सोमपूर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे काम पूर्णत्वास आणले आहे. या कालव्याच्या कामामुळे दुष्काळावर काही प्रमाणात मात करता येणार आहे. हा कालवा पूरपाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
या कालव्याचे जलपूजन सोमपूर येथे डॉ. तुषार शेवाळे व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरत कापडणीस, महेंद्र भामरे, संजय भामरे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. कांतीलाल देवरे, सुरेश महाजन, डॉ. नवलसिंग खैरनार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
उन्हाळ्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन डॉ. तुषार शेवाळे यांनी कसमादेत जलसमृद्धी अभियान राबविले होते. यावेळी हा कालवा कोरण्यासाठी त्यानी मोफत पोकल्यान यंत्र उपलब्ध करून दिले. तर सोमपुर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून यासाठी डिझेलची व्यवस्था केली होती. (वार्ताहर)