रुसलेल्या पावसाला चिमुकल्यांची आळवणी
By Admin | Updated: July 7, 2014 00:09 IST2014-07-06T22:34:20+5:302014-07-07T00:09:51+5:30
रुसलेल्या पावसाला चिमुकल्यांची आळवणी

रुसलेल्या पावसाला चिमुकल्यांची आळवणी
सिन्नर : डोक्याला व कमरेला कडूनिंबाच्या डहाळ्या बांधून, अंगावर वेगवेगळ्या रंगाचे पट्टे रेखाटून पहिल्या इयत्तेतील चिमुकले ‘धोंडी-धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे’ हे गाणे तालासुरात म्हणत एस. जी. पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पावसासाठी वरुणराजाला आळवणी घातली.
नाच-गाणे करीत हे चिमुकले शाळेतल्या इतर वर्गांसमोर गेले तेव्हा तेथील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही कोण आले म्हणत आश्चर्यचकीत झाले. ‘आम्ही धोंडी आहोत. आम्हाला पाणी द्या, पाऊस पडत नाही, आम्हाला पावसात चिंब व्हायचे आहे, आमच्यावर पाणी शिंपडा! असे या धोंडींनी म्हटल्यावर शिक्षकांनी पाण्याचा शिडकावा करत या धोंडींची पाण्याने भिजण्याची हौस पूर्ण केली.
पाठ्यक्रमातील एका गाण्याला शैक्षणिक अनुभूती देऊन प्रत्यक्ष सादरीकरणातून घडवून आणलेल्या या प्रसंगातून वर्गशिक्षक विनायक काकुळते यांनी या धोंडीची संकल्पना विद्यार्थ्यांसोबत इतर शिक्षकांनाही सहज स्पष्ट करून दाखविण्याचा हा प्रसंग शाळेमध्ये वेगळेच चैतन्य निर्माण करून गेला.
इयत्ता पहिलीच्या भाषा विषयात धोंड धोंड पाणी दे.. हे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भिलोरी बोलीभाषेतील गाणे आहे. त्यात उन्हाळा संपल्यानंतर जून महिन्यात पाऊस पडत नसल्यावर धोंड, धोंड किंवा धोंड्या म्हणजेच लहान व तरुण मुले लिंबाचा पाला डोक्याला व कमरेला बांधून घरोघरी पाणी मागतात. सुवासिनी या धोंडीवर पाणी ओतून ओले करतात. त्याला ओले केल्यावर वरुणराजा प्रसन्न होतो व पाऊस पडतो ही त्यामागची श्रद्धा आहे. एका विशिष्ट लय व चालीत सदर गाणे म्हणून नाच केला जातो. हा प्रसंगी शिक्षक विनायक काकुळते यांनी मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्यासोबत चर्चा करून हुबेहूब घडवून आणला. मुलांना त्या गाण्यातील बोलाचे अर्थही कळाले आणि त्यामागची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली.
चालू वर्षी जून संपला, जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. धोंडीच्या आळवणीनंतर पाऊस पडेल या उद्देशाने विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम राबविला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या गोष्टींना थारा नसला तरी राज्यातील विविध प्रदेश व चालीरीती व बोलीभाषांचा प्रसार व्हावा त्याची माहिती इतरांना मिळावी व त्यातून आपुलकी निर्माण व्हावी हाच मुख्य हेतू असल्याने केवळ विद्यार्थ्यांना मनोरंजनातून आनंददायी शिक्षण देण्यासाठी असे प्रसंग शाळेत उभे करावे लागतात व त्यासाठी संस्था शिक्षकांना
नेहमीच प्रोत्साहित करीत असल्याचे संचालक राजेश गडाख यांनी यावेळी सांगितले. सदर उपक्रमात मुख्याध्यापक उदय कुदळे, वर्गशिक्षक विनायक काकुळते, पांडुरंग लोहकरे, मेधा शुक्ल, वृषाली जाधव, मनीषा जाधव, मनीषा कडलग, भास्कर गुरुळे, सतीश बनसोडे आदिंसह शिक्षकांनी सहभाग नोंदविला. (वार्ताहर)