नाशिक : शहरात गेल्या मंगळवारी (दि.२) झालेल्या मुसळधार पावसासह गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे असंख्य रहिवाशांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे, परंतु आणखी सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले आहे. महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, परंतु अशाच प्रकारचे सहकार्य इतरही सामाजिक संस्थांकडून अपेक्षित असून, संबंधित संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे. सामाजिक संस्थांनी महापालिकेकडे संपर्क साधल्यास गरजू पूरग्रस्तांपर्यंत योग्य ती मदत पोहोचविणे शक्य होईल. त्यासाठी संस्थांनी महापालिकेचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख अनिल महाजन (९४२३१७९१०१), विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे (९४२३१७९१२३), नितीन नेर (९४२३१३१३२१), अे. पी. वाघ (९४२३१७९१२६), एस. एन. वसावे (९४२३१७९१२२) आणि आर. आर. गोसावी (७५८८०३८५८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौरांनी केले. त्याबाबत महापौरांनी शुक्रवारी सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. (प्रतिनिधी)
सामाजिक संस्थांना महापौरांचे मदतीचे आवाहन
By admin | Updated: August 6, 2016 00:50 IST