अंगणवाडी कर्मचारी अद्याप पगाराविनाच
By Admin | Updated: August 14, 2014 21:51 IST2014-08-14T21:02:40+5:302014-08-14T21:51:51+5:30
अंगणवाडी कर्मचारी अद्याप पगाराविनाच

अंगणवाडी कर्मचारी अद्याप पगाराविनाच
नाशिक : महापालिकेच्या सुमारे साडेआठशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दहा टक्के वाढ देण्याची घोषणा करण्यात आली खरी; परंतु वाढीव वेतन दूरच प्रत्यक्षात दोन महिन्यांचे नियमित वेतनच मिळालेले नसून त्यामुळे चूल कशी पेटवावी, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या ४१९ अंगणवाड्या असून, त्यात साडेआठशे सेविका आणि मदतनीस काम करतात. या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात या कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी महापौरांनी बोलावलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत दरवर्षी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा टक्के वाढ करावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु मानधनात कोणतीही वाढ झाली नाही.
यंदाच्या वर्षी महापौरांनी अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ देण्यासाठी अंदाजपत्रकात जादा आर्थिक तरतूद केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता मानधनातील वाढ मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु दोन महिने झाले तरी या कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन नाहीच, तर नियमित मानधनही मिळालेले नाही.
सर्व कर्मचारी पालिका प्रशासनाकडे उंबरठे झिजवत आहेत, परंतु त्याचा उपयोग होत नाही. आयुक्तांकडे फाईल प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असताना या महिलांना वेतन नाही. रक्षाबंधनाचा सणही असाच गेला. आता गौरी-गणपती तोंडावर असून, पालिकेच्या उदासीनतेमुळे या कर्मचाऱ्यांना चुली कशा पेटवायचा असा प्रश्न पडला आहे.
सदरच्या साडेआठशे महिलांनी आपल्या कामगार संघटनेत सामील व्हावे यासाठंी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहेत. परंतु या कर्मचारी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्यानेच वाढीव आणि नियमित मानधन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या सेविकांनी केला आहे. (प्रतिनिधी)