तेल्यामुळे डाळींब बागांवर नांगर
By Admin | Updated: July 6, 2014 00:18 IST2014-07-05T20:47:24+5:302014-07-06T00:18:06+5:30
तेल्यामुळे डाळींब बागांवर नांगर

तेल्यामुळे डाळींब बागांवर नांगर
संतोष वाघ
पिळकोस
कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, गांगवन परिसरातील सर्व डाळींबबागांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून, दरवर्षी डाळींब बागेसाठी अफाट खर्च करूनदेखील पदरी निराशाच मिळू लागल्याने अनेक शेतकरी डाळींबबागांवर नांगर फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे.
पिळकोस येथील शेतकरी भालचंद्र वाघ यांनी दोन वर्षांपूर्वी दोन हजार डाळींब रोपांची लागवड केली. फळ धरले असताना संपूर्ण डाळींबबाग तेल्याने बाधित झाली. तळहातावर जपलेली बाग तेल्यामुळे खराब झाल्याने त्यांनी संपूर्ण बाग काढून टाकली. परिसरातील बहुसंख्य डाळींब बागा तेल्याने बाधित झाल्याने उपटून टाकल्या जात असल्याचे चित्र सर्वदूर पहावयास मिळत आहे. परिसरात तेल्याचा शिरकाव झाल्यामुळे बळीराजाने बागेसाठी वर्षभरात लाखो रुपये भागभांडवल लावले होते. तेही वसूल होणे शक्य दिसत नाही. तब्बल दोन वर्षांपासून अशीच परिस्थिती असून, पुढेही हीच स्थिती कायम राहिल्यास डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्त्येशिवाय पर्याय राहणार नाही असे भालचंद्र वाघ, बुधा जाधव, केवळ वाघ, शांताराम जाधव, उत्तम मोरे, विष्णू जाधव, मार्कंड जाधव, अशोक जाधव, मधुकर वाघ, रमेश वाघ या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काही शेतकरी झाडावरील तेल्याग्रस्त फळे तोडून फेकत आहेत.