कुटुंब सर्वेक्षणात विभागातील पाचही जिल्हे पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:04+5:302021-05-05T04:25:04+5:30
नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात नाशिक विभागातील ...

कुटुंब सर्वेक्षणात विभागातील पाचही जिल्हे पिछाडीवर
नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या कामगिरीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाराजी व्यक्त केली असून, अनेक जिल्ह्यात या मोहिमेेतंर्गत घरोघरी जाऊन रूग्णांचा शोध घेण्यास टाळाटाळ तसेच त्यांची कोरोना तपासणी करण्यास उदासीनता दिसून आल्याने गमे यांनी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे व त्यांना उपचारार्थ रूग्णालयात भरती करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास हातभार लागण्याबरोबरच घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांचा शोध घेणे सहज शक्य झाले आहे. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून ही मोहीम राबवून दरमहा त्याचा आढावा विभागीय आयुक्तांकडून घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी या मोहिमेच्या माध्यमातून रूग्णांचा शोध घेण्यास मोठा हातभार लागल्याची उदाहरणेही आहेत. तथापि, मार्च, एप्रिल महिन्यात या मोहिमेचे काम काहीसे थंडावले असल्याचे विभागीय आयुक्तांना प्रत्येक जिल्ह्याने पाठविलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
संशयित रूग्णांचा शोध घेतल्यानंतरही त्याची तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले असून, काही जिल्ह्यात तर सर्वेक्षणच करण्यात आले नसल्याचे तर संशयित रूग्णांच्या संख्येच्या प्रमाणात तपासणी करण्यात आली नाही. नगरपंचायत, नगरपालिकांची या कामात उदासीनता दिसून आली असल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-----------
विभागीय आयुक्तांची निरीक्षणे
१) नाशिक जिल्हा- इगतपुरी, मालेगाव व येवला तीन तालुक्यात रूग्ण शोध मोहीम अत्यंत कमी आहे. संशयित व्यक्तींची संख्या २४४७ असतानाही १६३१ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले नाहीत.
२) धुळे जिल्हा- संशयित रूग्णांची संख्या ४७८ आहे. परंतु त्यापैकी एकाही व्यक्तीची तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वेक्षणाचा उद्देश सफल होत नाही.
३) जळगाव जिल्हा- वरणगाव नगर परिषदेचा अहवाल वस्तुस्थिती दर्शक असल्याचा संशय. जामनेर ग्रामीण, पारोळा, सावदा नगर परिषदेत सर्वेक्षण गांभीर्याने सुरू असल्याचे दिसत नाही.
४) नंदुरबार जिल्हा- शहादा नगर परिषद, तळोदा ग्रामीण, तळोदा शहर या ठिकाणी सर्वेक्षण गांभीर्याने सुरू नाही. ३६१ संशयित रूग्णांपैकी फक्त २० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.
५) अहमदनगर जिल्हा- नगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे दिसून येत नाही. संशयित व्यक्तींची संख्या ४९०२ असून, त्यापैकी फक्त ७४३ व्यक्तींचीच टेस्ट घेण्यात आली आहे.