कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

By Admin | Updated: August 6, 2014 00:44 IST2014-08-05T22:30:41+5:302014-08-06T00:44:30+5:30

कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

The aim of completion of Kumbh Mela works in time | कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट


 कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा देणे हा पालिकेच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. त्यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नाही हा एक भाग. त्याचबरोबर कुंभमेळा ही शासनाची जबाबदारी आहे. महापालिकेने यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्र्यांना निवेदन दिले आहे. केंद्र शासनाकडे अशा प्रकारे निधी मिळवण्यासाठी राज्य शासनामार्फतच जाणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. त्याचे योग्य ते सादरीकरण करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. महापालिकेचा राज्य शासनाकडे प्रलंबित असलेला निधी मिळावा तसेच केंद्राने शंभर टक्के निधी द्यावा यासाठी अनेक पत्रे पाठविण्यात आली आहेत. राज्य शासनाने निधी नाहीच उपलब्ध करून दिला तर त्याचे काय करावे याबाबत महासभेतच भूमिका ठरविली जाणार आहे, असे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी सांगितले.
नाशिक : कुंभमेळा हा देशपातळीवरील सोहळा आहे. त्यादृष्टीने त्याचे नियोजन केले पाहिजे, हे लक्षात घेऊन महापालिकेने चार वर्षे अगोदरच तयारी केली आणि शासनाकडून आराखडा मंजूर होत असताना त्यादृष्टीने नियोजन केले. एकूण आराखड्यात मंजूर असलेल्या महापालिकेच्या १०५२ कोटी रुपयांच्या आराखड्यातील ६९३ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने आत्तापर्यंत केवळ २२२ कोटी १७ लाख रुपयांचाच निधी दिला असून, उर्वरित निधी उपलब्धतेसाठी केंद्र आणि राज्य शासन असा दोन्हीकडे पाठपुरावा सुरू आहेच; परंतु कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षी कुंभमेळ्याच्या आत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. नाशिकचे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी ही माहिती दिली.
कुंभमेळा हा देशपातळीवरील उत्सव असतो. साहजिकच त्याचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते. नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याची तयारी त्याच दृष्टीने केली. महापालिकेने कुंभमेळ्यासाठी सर्वप्रथम २८ आॅगस्ट २०१२ रोजी महासभेत कृती आराखडा संमत केला. कुंभमेळा ज्या पंचवटी भागात भरतो तो आणि अन्य भागांतील दळणवळणाच्या सुविधांचा विचार करता २५०५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. कुंभमेळा मुळातच केवळ महापालिकेची पूर्ण जबाबदारी नसल्याने महापालिकेने २५०५ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी दहा टक्के म्हणजेच २५० कोटी रुपयांचा खर्च महापालिका संमत करू शकेल, असे स्पष्ट केले होते. तथापि, दरम्यानच्या काळात महापालिकेच्या उत्पन्नाच्या साधनांवर घाला घालण्यात आला. जकात रद्द करून एलबीटी लागू करण्यात आला, त्याचा फटका बसला. राज्य शासनाकडून मिळणारे प्रलंबित अनुदान मिळाले नाही. याच दरम्यान, २०१३ मध्ये कुंभमेळ्यासाठी राज्य शिखर समिती तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती अशा विविध समित्या स्थापन झाल्या. या समित्यांमध्ये महापालिकेच्या १०५२ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, त्यानुसारच कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या कुंभमेळ्यात एक लाख साधू- महंत येणार असा अंदाज बांधून साधुग्राम तसेच अन्य सोयींचे नियोजन करण्यात आले होते. आता साडेतीन लाख साधू-महंत तसेच सव्वा कोटी भाविक येतील असा अंदाज बांधून नियोजन करण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले अशी ३६ कामे असून, त्याची एकूण रक्कम ६९३ कोटी रुपये इतकी आहे. त्यात ४६५ कोटी रुपयांची २० कामे केवळ रिंगरोडची आहेत. शहरात होणाऱ्या अंतर्गत आणि बाह्य रिंगरोडच्या कामांमुळे वाहतुकीसाठी अनेक पर्यायी मार्ग तयार होणार असून, हे काम कायमस्वरूपी राहणार आहे. आराखड्यात भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ९० कोटी रुपयांचे भूसंपादन सुरू आहे. २०१४-१५ या कालावधीत १३७ कोटी १३ लाख रुपयांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
कुंभमेळ्यासाठी रिंगरोडबरोबरच अन्य काही मूलभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यंदा तीन ते साडेतीन लाख साधू-महंतांच्या वास्तव्याच्या दृष्टीने नियोजन आहे. साधुग्राममधील साधूंसाठी तात्पुरत्या स्वरूपात जादा शौचालये, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, गटारी अशी कामे करून चोवीस तास पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्यात तिन्ही पर्वण्यांसाठी एकूण सव्वा कोटी भाविक येतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन करताना शहरात येणाऱ्या या भाविकांच्या वाहनांची सोय शहराच्या प्रवेशद्वाराशीच केली जाणार आहे. दिंडोरीरोडवर म्हसरूळ, पेठरोडवर मखमलाबाद शिवार आणि आडगाव या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था असून, तेथे तसेच पर्वणीसाठी रामघाटावर येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, शौचालय आदि व्यवस्था करण्यात येणार आहे.
केवळ वाहनतळांसाठी २० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असून, दहा हजार तात्पुरती शौचालये, २५ फिरती शौचालये यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्वणीच्या दिवशी गर्दीचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग असला, तरी पालिका, वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने हे काम करण्यात येणार आहे.

Web Title: The aim of completion of Kumbh Mela works in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.