नाशिक : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात चालू वर्षी ७३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक उद्दिष्ट वनविभागाला ३० लाखांचे, तर जिल्हा परिषदेला १८ लाखांचे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ८० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना, अवघ्या ६१ लाख १२ हजार वृक्षांचीच लागवड करण्यात आली होती. यावर्षी १२ ते १९ जूनदरम्यान वृक्ष लागवड सप्ताह जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यात ही वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी जी. एम. गाडीलकर यांनी दिली. यावर्षी ७३ लाखांचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यात कृषी विभागाला सात लाख, वनविकास महामंडळाला नऊ लाख ८८ हजार, उपवनसंरक्षक विभाग (पूर्व)ला १० लाख २८ हजार, तर उपवनसंरक्षक विभाग (पश्चिम) ला १९ लाख ७२ हजार, मालेगाव उपविभागीय वन विभाग सात लाख २५ हजार, सामाजिक वनीकरण- एक लाख २० हजार, पाटबंधारे विभाग- ३० हजार, सार्वजनिक बांधकाम विभाग- २० हजार, तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला १८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड ग्रामपंचायत परिसर, ग्रामपंचायत जमिनी, शाळा, रस्ते यांसह खासगी ठिकाणी करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, तर एका वृक्षामागे एक कामगार वर्षभर कार्यरत राहणार असून, त्याला वर्षभर रोजगार मिळणार आहे. त्या वृक्षाला खते, पाणी, संरक्षक जाळी यांसह विविध कामे या मजुराला करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)