महेश गुजराथी
चांदवड (जि. नाशिक): मल्हारराव होळकर यांनी चांदवड येथे रंगमहाल बांधला. या वाड्यातच पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उपराजधानी केली आणि चार महिने त्या येथेच मुक्कामी असत. या वाड्याची पडझड झाल्यामुळे पुरातत्त्व विभागामार्फत त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी एक दशक उलटले तरी हे काम झालेले नाही. मोठा निधी आला; मात्र पाहिजे तशी दुरुस्ती झाली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली रंगमहाल पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. चांदवडच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रंगमहाल सन १७४० ते १७५७ या काळात बांधला गेला असावा. या महालाचे बुरूज आणि भिंती आता जीर्ण होऊन डागडुजीला आल्या आहेत. रंगमहालाचा मूळ ढाचा कायम ठेवून नूतनीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी सन २०१५मध्येच आला होता. सध्या नूतनीकरणाचे काम बंद आहे. रंगमहालात विविध २१ शासकीय कार्यालये सन १९९० पर्यंत कार्यरत होती. आता येथे केवळ मोकाट प्राण्यांचा मुक्तसंचार होत आहे.
रेणुकादेवी मंदिरापर्यंत भुयार
चांदवडच्या रंगमहालापासून गावाबाहेर असलेल्या रेणुकादेवी मंदिरापर्यंत भुयार खणण्यात आले आहे. या भुयारातून अहिल्यादेवी या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जात येत असत. मात्र, कालांतराने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जन्मसोहळा जामखेड (जि. अहिल्यानगर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी (ता. जामखेड) येथे त्रिशताब्दी जन्मसोहळा उत्सव उद्या, शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.