निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच
By Admin | Updated: August 22, 2014 00:30 IST2014-08-21T22:46:38+5:302014-08-22T00:30:51+5:30
निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच

निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच
नाशिक : राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता राजकीय व शासकीय पातळीवर व्यक्त करून त्या दृष्टीने पावले टाकली जात असली तरी, विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आयोगाने २५ आॅगस्टपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन केलेले असल्यामुळे त्यानंतरच आचारसंहिता लागू होण्याची ठाम खात्री निवडणूक शाखेने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम गेल्या महिन्यापासूनच वाजू लागले असून, खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगानेच तसे संकेत देऊन मतदार याद्यांचे पुनरीक्षण (पान ७ वर)
व अंतिम मतदार यादी जाहीर करून यंत्रणेला निवडणुकीच्या कामाला लावले आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे दिल्ली येथे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना निवडणूक पद्धती हाताळण्याबाबत अवगत केले असल्याने कोणत्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार व लोकप्रतिनिधींनीही त्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालविली असताना, चालू आठवड्यात आचारसंहिता लागण्याची व्यक्त होणारी शक्यता जवळपास मावळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २० ते २५ आॅगस्टदरम्यान प्रत्येक विभागीय पातळीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता जारी केल्यास त्याच दिवशी व वेळेस प्रत्येक निवडणूक अधिकारी हा मुख्यालयात हजर असला पाहिजे व त्याने तत्काळ आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली पाहिजे असा निवडणूक आयोगाचा दंडक असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आचारसंहिता जारीच केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव एस. ए. रुदोला, प्रधान सचिव आशिष चक्रवर्ती, आर. के. श्रीवास्तव व राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार व गुरुवारी पुणे व कोकण या विभागाचे प्रशिक्षण पुण्याच्या यशदा संस्थेत घेण्यात आले. नाशिक व औरंगाबाद या दोन विभागांचे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस औरंगाबाद येथे प्रशिक्षण असून, रविवार व सोमवारी नागपूर व अमरावती या दोन विभागांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सारेच अधिकारी सोमवारपर्यंत व्यस्त असल्याने तूर्त त्यानंतरच आचारसंहिता जारी होईल, असे ठामपणे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)