अखेर पुनेगावचे पाणी पोहचले दरसवाडी धरणात
By Admin | Updated: September 5, 2016 23:12 IST2016-09-05T23:12:17+5:302016-09-05T23:12:53+5:30
४० वर्षांची प्रतीक्षा संपली : येवलेकरांच्या पाणी चाचणीच्या आशा धूसर

अखेर पुनेगावचे पाणी पोहचले दरसवाडी धरणात
गोरख घुसळे ल्ल पाटोदा
वेळ : दुपारी ४ वाजेची.
स्थळ : दरसवाडी कालवा
गेल्या ४० वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व चांदवड व येवला तालुक्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी सोडण्यात आलेले पाणी सोमवारी तब्बल अकरा दिवसांनी दुपारी चार वाजता ६१.७०५ किलोमीटर परसूल जवळील नदीपात्रातून दरसवाडी धरणात पोहचल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असुन शेतकर्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, दरसवाडी धरण ९० टक्के भरले तरच पुढे येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत ४२ किलोमीटर या डोंगरगाव पोहोच कालव्यास चाचणीसाठी पाणी सुटू शकते अशी चर्चा असल्याने येवला तालुक्यातील बाळापुरपर्यंत पाणी चाचणी होते की नाही याबाबत शंका निर्माण झाली असल्याने येवलेकरांच्या चाचणीसाठी पाणी पोहोचण्याच्या आशा धूसर झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले असल्याने व वाया जाणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याची चाचणी घ्यावी अशी मागणी कडवा कालवा विभागाकडे येवला तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीला संबधित विभागाने केराची टोपली दाखविल्याने शेलार व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट पासून कातरणी येथील कालव्यावरच उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत ओव्हरफ्लोच्या पाण्याने या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेऊन उपोषण तीव्र केल्याने काही उपोषणार्थीची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर काहींनी जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती.
तिसऱ्या दिवशी कडवा कालवा विभागाचे अभियंता टाटीया यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चाचणीसाठी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणार्थीनी आपले आंदोलन मागे घेतले. आश्वासनाप्रमाणे दि. २६ आॅगस्ट रोजी पुणेगाव धरणातून या कालव्यास चाचणीसाठी सुमारे १०० क्युसेस पाणी सोडण्यात आले. मात्र या कालव्याची ही पहिलीच चाचणी असल्यामुळे पाणी गळती मोठया प्रमाणात होत असल्याने व कालवा परिसरात मोठया प्रमाणात पाणी चोरीही होत असल्याने पाण्याचा प्रवाह संथ व कमी वाहत असल्याने पाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता व चाचणी पूर्ण होते की नाही याबाबत शंका होती. गेल्या अकरा दिवसांपासून विविध अडथळ्यांंची शर्यत पार करीत पाण्याचा प्रवाह आज दरसवाडी धरणाजवळील परसूल गावच्या नदीतून प्रवाहित होऊन दरसवाडी धरणात पोहोचल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असुन अनेक शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.