हुतात्मा स्मारकाचा प्रशासनाला विसर
By Admin | Updated: August 11, 2014 00:39 IST2014-08-10T23:04:55+5:302014-08-11T00:39:58+5:30
हुतात्मा स्मारकाचा प्रशासनाला विसर

हुतात्मा स्मारकाचा प्रशासनाला विसर
सुरगाणा : गेल्या वर्षी १५ आॅगस्टला दुपारचेवेळी गुलमोहराचे झाड पडून जमीनदोस्त झालेल्या हुतात्मा स्मारकाचे एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप बांधकाम करण्यात आले नसून, क्रांतिदिनीदेखील याठिकाणी प्रशासनाला पुष्पगुच्छ अर्पून पूजन करण्याचा साफ विसर पडल्याचे दिसून आले आहे.
येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर कै. वामनराव गंगाधर भांबेरे व कै. दामोधर महादेव
अहिरराव यांचे हुतात्मा स्मारक होते. गेल्यावर्षी १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी प्रशासन व ग्रामस्थांनी स्मारकाचे
पूजन करून पुष्प अर्पण केले
होते. त्याचदिवशी दुपारच्या वेळी या हुतात्मा स्मारकावर गुलमोहराचा वृक्ष कोसळून पडल्याने स्मारक पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे नवीन स्मारकाचे बांधकाम केले जावे या मागणीचे निवेदन भांबेरे कुटुंबीयांनी दिले होते.
मात्र केवळ आश्वासनापलीकडे काही होऊ शकले नाही.
क्रांतिदिनी या स्मारकाचे दरवर्षी पूजन करून पुष्प वाहिले जातात. मात्र यावर्षी या हुतात्मा स्मारकाचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसून आले असून, १५ आॅगस्टपूर्वी हुतात्मा स्मारकाचे बांधकाम आहे तिथेच करावे किंवा नवीन तहसील आवारात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी सुधाकर भांबेरे, प्रवीण भांबेरे, चेतन भांबेरे यांनी केली आहे. (वार्ताहर)