विज्ञान-अध्यात्माची सांगड घालावी
By Admin | Updated: August 24, 2015 23:21 IST2015-08-24T23:21:10+5:302015-08-24T23:21:36+5:30
पंकजा मुंडे : सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे ध्वजारोहण

विज्ञान-अध्यात्माची सांगड घालावी
नाशिक : मानवाचे कल्याण साधण्याचे कार्य धर्म करतो. प्रत्येक धर्म, पंथ, संपद्राय आणि भक्ती यांची रूपे वेगवेगळी असली तरी, मानवाचे कल्याण हाच सर्वांचा उद्देश आहे. तरुण पिढी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असली तरी जीवनात आत्मशांतीसाठी अध्यात्माची गरज आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालण्याची आवश्यकता आहे, असे विचार राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्रामधील स्वामी प्रा. डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जनतेची भक्ती ज्यामागे आहे तोच खरा श्रेष्ठ धर्म होय. आमच्यासाठी लोककल्याण, लोकसेवा हाच धर्म असतो. विज्ञान तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जीवनात प्रचंड सुखसोयी आल्या; परंतु मनाची शांती नष्ट होत आहे. यासाठी धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून हे कार्य साधले जाते, असेही त्यांनी सांगितले. लोककल्याणाचे कार्य करताना वाईट प्रवृतींशी संघर्ष करण्यासही आपण तयार आहोत. एक संवेदनशील स्त्री म्हणून माझ्या हातून जनतेचे आणि धर्माचे कार्य घडो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
महापौर अशोक मुर्तडक यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांचा आढावा घेऊन, राज्य सरकारकडे आणखी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केले. प्रा. डॉ. गुट्टे महाराज यांनी सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या कार्याचा आढावा घेतला. या सोहळ्यास आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, हेमंत धात्रक, लक्ष्मण सावजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, सुनील केदार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी संजीव अहिरे यांनी परिचय करून दिला. सोमनाथ बोडके यांनी सूत्रसंचालन केले. श्याम पिंपरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास दामोदर मानकर बाळासाहेब पालवे, बुधाजी पानसरे आदि उपस्थित होते.