९५ टक्के विद्यार्थ्यांनी नीट दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:39+5:302021-09-13T04:14:39+5:30
नाशिक : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नाशिकमधील २४ केंद्रांवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला ...

९५ टक्के विद्यार्थ्यांनी नीट दिली परीक्षा
नाशिक : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नाशिकमधील २४ केंद्रांवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला (नीट) तब्बल ९५ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थितीत राहत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करीत परीक्षा दिली. तर चार ते पाच टक्के विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांनी या परीक्षेला उपस्थित राहू शकले नाही. परीक्षार्थींमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करताना पावसाच्या हलक्या सरींचा सामना करावा लागला. तर काही विद्यार्थ्यांना कडक नियमांमुळे सोबत आणलेले साहित्य पुन्हा पालकांकडे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावरून माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले.
नाशिक जिल्ह्यातील २४ केंद्रावर झालेल्या ‘नीट’ परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसह पालकांची पावसामुळे तारांबळ उडाली पाऊस सुरू असल्याने हॉल तिकीट व ओळखपत्रे जपण्यात विद्यार्थ्यांना अडचणींच सामना करावा लागला. नाशिकमधून सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी जवळपास ९० ते ९५ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोरोनामुळे एका वर्गात केवळ १२ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते प्रतिबंधात्मक अंतर पाळले गेले. तत्पूर्वी सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी १.३० पर्यंत विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पारदर्शक पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवण्यास परवानगी मिळाली. परंतु रंगीत बाटली परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तर विद्यार्थ्यांना आवश्यक मास्कही परीक्षा केंद्रावरच पुरविण्यात आले.
---नियमांची काटेकोर अंमलबजावणी
नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मागील वर्षी दिलेल्या काही सवलती यावर्षी रद्द करून विशिष्ट पेहराव व नियम घालून देण्यात आले होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टी पालकांकडे ठेवण्यासाठी काही विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारापासून पुन्हा परतावे लागले. काही विद्यार्थ्यांनी बेल्ट, रुमाल, पाकीट, पेन, पैसे, घड्याळ यासह इतर वस्तू परीक्षा केंद्राबाहेरच काढून न ठेवता परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुन्हा त्या वस्तू ठेवण्यासाठी माघारी फिरावे लागले.
--
परीक्षार्थी, पालकांमुळे वाहतूक कोंडी
विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी तीन तास अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची एकाच वेळी होणारी गर्दी नियंत्रित ठेवणे परीक्षा केंद्र संचालकांना शक्य झाले; मात्र परीक्षा संपल्यानंतर एकाच वेळी सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक रस्त्यावर आल्याने परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची कोडी झाल्याचे दिसून आले. यावेळी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या पालकांसह अन्य वाहनचालकांनीही नाराजी व्यक्त केली.