शहरात ८0९ मुले शाळाबाह्य
By Admin | Updated: September 6, 2016 22:58 IST2016-09-06T22:57:56+5:302016-09-06T22:58:07+5:30
मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज : अभिषेक कृष्ण

शहरात ८0९ मुले शाळाबाह्य
सिडको : महाराष्ट्र हा प्रगतशीर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आपण बोलत असलो तरी आजही महाराष्ट्रात रस्ते, वीज, पाणी यापलीकडे बोलले जात नाही. परंतु समाजाचे घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व समाज घडवू शकतात अशांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने स्वातंत्र्य मिळूनही उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करीत, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केले. शहरात सुमारे ८00 मुले शाळाबाह्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
खुटवडनगर येथील इस्पॅलियर स्कूलमध्ये आज शाळाबाह्य मुलांच्या अहवाल सादर करण्यात आला याप्रसंगी आयुक्त कृष्ण बोलत होते. आजही शाळाबाह्य मुलांची व बाल कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, आरोग्याचीदेखील व्यवस्थित सुविधा नाही. शाळाबाह्य मुले ही समाजाचे घटक असून, त्यांची जर काळजी घेतली नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. रस्ते, नाले, गटारी यावर कोट्यवधी रुपये शासन खर्च करीत असले तरी भविष्यातील नागरिक चांगले घडविण्यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. शहरातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मुलांना शिक्षण देत असून, मनपा शाळेतील शिक्षकांनी मुलांना शिकविण्यासाठी एक चौकट आखून घेतली असून, त्या चौकटीच्या बाहेर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याने ही चिंतेची बाब आहे. यापुढील काळात मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन मनपाने विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण देणे ही जबाबदारीच असल्याचेही आयुक्त कृष्ण यांनी सांगितले.
यावेळी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, मनपा शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण, नगरसेवक तानाजी जायभावे, भीष्मराज बाम आदिंनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शाळेचे संचालक सचिन जोशी यांनी, तर सूत्रसंचालन योगीता गोखले यांनी केले. यावेळी अपर्णा घटे, संदीप शिंदे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)