पालिकेच्या ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By Admin | Updated: October 31, 2015 00:02 IST2015-10-31T00:01:31+5:302015-10-31T00:02:31+5:30
नोंदवही कार्यक्रम : प्राथमिक शिक्षकांना वगळले

पालिकेच्या ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कार्यक्रमासाठी महापालिकेने ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या अतिरिक्त कामाबद्दल नाराजी दर्शवत वसुली कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत दैनंदिन कामकाज सांभाळून कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडावाच लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कामासाठी महापालिकेने आपल्या आस्थापनेवरील ७८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, तर त्यातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे. मात्र माध्यमिक शिक्षकांना सदर काम देण्यात आले आहे. दरम्यान, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या कामासाठी जुंपण्यात आल्याने पूर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे,
या अतिरिक्त कामामुळे घरपट्टी सूचनापत्र, पाणीबिल वाटप तसेच वसुलीच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होणार आहे. सदर अतिरिक्त कामकाज केवळ वसुली कर्मचाऱ्यांनाच देण्यात आले आहे. याचबरोबर सध्या पाणीकपातीची अंमलबजावणी सुरू असल्याने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांऐवजी वसुली कर्मचाऱ्यांनाच मोटार जप्तीचे व दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कामावर ताण पडणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)