गंगापूर धरणातून ७ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; गोदावरीची वाढली पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:14 IST2017-09-20T21:00:35+5:302017-09-20T21:14:40+5:30
मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली

गंगापूर धरणातून ७ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; गोदावरीची वाढली पातळी
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे अंबोली धरणातून गंगापूरमध्ये विसर्ग सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्गाला प्रारंभ केला गेला. संध्याकाळपर्यंत ७ हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने गोदावरीचा जलस्तर उंचावला होता. यामुळे बुधवारचा आठवडे बाजारही रद्द झाला.
मंगळवारी रात्रीपर्यंत शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाची हजेरी टप्प्याटप्प्याने सुरू होती. यामुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून बुधवारी (दि.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १९ मि.मी इतका पाऊस शहर व परिसरात पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे; मात्र दिवसभरात पावसाने शहरात हजेरी लावली नाही. मंगळवारी रात्रीपर्यंत झालेला पाऊस आणि अंबोली धरणाच्या परिसरातील पावसामुळे गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गाने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहचले होते. सर्वपित्री अमावस्या, बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे गोदाघाटाच्या परिसरात सकाळपासून दिवसभर नागरिकांची गर्दी होती. गोदावरीच्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे आठवडे बाजारावरही परिणाम झाला.
अंबोली धरण हाऊसफुल्ल झाल्यामुळे गंगापूर धरणात विसर्ग करण्यास प्रारंभ झाल्याने गंगापूर धरणसाठाही शंभर टक्क्यांवर पोहचल्यामुळे धरणातून सकाळी विसर्गाला सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता दोन हजार दोनशे क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी विसर्ग साडेचार हजार क्यूसेकपर्यंत वाढला तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत ७ हजार ७४२ क्यूसेकवर विसर्ग पोहचला होता. धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे सोमेश्वरजवळील दूधसागर धबधब्याचेही पाणी वाढले होते. बुधवारी दिवसभर शहरासह गंगापूर धरण व समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. रात्री पावसाचा जोर वाढल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल अथवा विसर्ग कमी केला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.