६३८ लाभार्थींपुढे मनपा हतबल
By Admin | Updated: September 10, 2016 01:02 IST2016-09-10T01:01:47+5:302016-09-10T01:02:27+5:30
स्वच्छ भारत अभियान : शौचालय उभारणीत टाळाटाळ

६३८ लाभार्थींपुढे मनपा हतबल
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत ७२९४ लाभार्थींना शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. आतापर्यंत ४४०६ शौचालयांची उभारणी झाली आहे, मात्र ६३८ लाभार्थींनी महापालिकेला पुरते जेरीस आणले आहे. सदर लाभार्थी अनुदानाचे पैसेही परत करत नाहीत आणि शौचालयही उभारत नाहीत, अशी स्थिती आहे.
महापालिकेमार्फत शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७२६४ लाभार्थींपैकी ४४०६ लाभार्थींनी शौचालय उभारले आहे. ११०५ लाभार्थींकडून शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालयासाठी प्रतीलाभार्थी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पहिला हप्ता सहा हजार रुपयांचा अदा केला जातो. शौचालय उभारल्यानंतर उर्वरित सहा हजारांचे अनुदान लाभार्थींच्या बॅँक खात्यात जमा केले जाते. त्यानुसार आतापर्यंत ६६६३ लाभार्थींच्या बॅँक खात्यात अनुदान जमा झालेले आहे. काही लाभार्थींकडे शौचालय उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ३०२ लाभार्थींनी पैसे महापालिकेला परत केले आहेत; मात्र ६३८ लाभार्थींच्या बॅँक खात्यात पहिला हप्ता जमा करूनही त्यांनी शौचालय उभारणीस प्रतिसाद दिलेला नाही आणि पैसेही परत केले नसल्याने त्यांच्याकडून वसुली कशी करावी, याबाबत महापालिकेचे अधिकारी हतबल झाले आहेत. सदर लाभार्थींना शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यालाही दाद देत नसल्याने मनपा पेचात सापडली आहे. (प्रतिनिधी)