पर्यटनस्थळ विकासासाठी ५० लाखांचा निधी
By Admin | Updated: January 9, 2017 00:44 IST2017-01-09T00:44:34+5:302017-01-09T00:44:43+5:30
हतगड : महाराष्ट्र वनविभागाने गुजरात राज्याच्या कामाचा आदर्श घ्यावा

पर्यटनस्थळ विकासासाठी ५० लाखांचा निधी
कनाशी : सुरगाणा तालुक्यातील हतगड पर्यटनस्थळासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून अविकसित असलेल्या हतगड किल्ल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास खात्यामार्फत संवर्धन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आकर्षक पर्यटनस्थळ उभारण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून ५० लाख रुपये निधी कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती हतगड यांच्या खात्यावर प्राप्त झाला आहे.
कनाशी वनपरिक्षेत्र कार्यकक्षेतील हतगड किल्ला हा पर्यटनस्थळ होण्यासाठी वनसंरक्षक अरविंद पाटील व मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकासाच्या बैठकीत आकर्षक पर्यटनस्थळ तयार करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हतगड किल्ल्याची निवड झाली आहे. त्यानुसार किल्ल्याचा पुरातत्व विभागमार्फत विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये किल्ल्यावर असलेल्या पुरातत्व वस्तू, प्रेक्षणीय ठिकाणे, धान्य गुदामे, तबेले यांची आजची स्थिती याबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. किल्ल्याची विकासकामे होणार असल्याची माहिती अमोल आढे यांनी दिली. किल्ल्यावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला पाइप रेलिंग, किल्ल्याच्या पायऱ्या दुरुस्ती, दरड प्रतिबंधक जाळ्या, मजुरांसाठी निवारा शेड, व्यवस्थापन विभागासाठी दोन खोल्या, मुख्य प्रवेशद्वार, संपूर्ण किल्ल्याच्या परिसराला लोखंडी संरक्षक जाळ्या व डागडुजी आदि विकासकामे गेल्या दोन वर्षांत झाली आहेत. या किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. किल्ल्याच्या निम्म्या भागापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहने जातात. विकासकामांमुळे पर्यटकांना किल्ल्यावर लवकरात लवकर पोहोचणे शक्य होणार असून, वेळ व श्रम वाचणार आहेत. किल्ला संवर्धन व विकास कार्यक्रमांतर्गत हे आकर्षक पर्यटनस्थळ होणार असून, त्याबाबत वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. (वार्ताहर)