2 कोटींच्या क्रीडा संकुलाचे तीन तेरा !
By Admin | Updated: June 27, 2014 00:17 IST2014-06-26T20:33:31+5:302014-06-27T00:17:41+5:30
सारीच दुरवस्था : तरण तलाव आटला; धावपट्टीवर गाजर गवत

2 कोटींच्या क्रीडा संकुलाचे तीन तेरा !
येवला : दोन कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या तालुका क्रीडा संकुलातील सुविधांची दैनंदिन व्यवस्थापनाच्या अभावामुळे दुरवस्था झाली आहे. वारंवार बैठका व चर्चा होत असल्या तरी नागरिकांना खेळाडूंना या संकुलातील सुविधांचा वापर चांगल्या पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
प्रारंभी चांगले रूप धारण केलेला जलतरण तलावात जेमतेम काही दिवस पाणी दिसलं; परंतु सक्षम एजन्सीचा अभाव असल्याने कार्यक्षम पद्धतीने जलतरण तलाव चालू शकला नाही. सध्याच्या अवस्थेत पाण्यासाठी असलेली ओव्हेरहेड टाकी, नळाच्या तोट्या, चेंजिंग रूमसह विविध ठिकाणचे दरवाजे तुटले आहेत. तलावात लावलेल्या निळ्या आकर्षक रंगाच्या टाइल्स फुटल्या असून, लाइटची व्यवस्था नाही. जलतरण तलावात गावचीच मुलं किमान पोहायला शिकली असती; पण पालिकेनेच पाणी देण्याला विरोध केला. जलशुद्धीकरण काम देत नाही. इलेक्ट्रीक फिटिंगदेखील खराब झाली आहे. याबाबतीत पाणी उपलब्ध करण्यासाठी पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. एखाद्या खासगी कार्यक्षम चालकाला, ती चालवण्यास द्यावी म्हणजे किमान ‘पे अॅण्ड स्वीम’चा तरी आनंद येवलेकरांना घेता येईल. केवळ कागदावरच जलतरण तलाव राहायला नको. त्याचा प्रत्यक्ष अनुभवदेखील घेता यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२५ बाय २१ मीटर आकाराचा हा तलाव सध्या दुरुस्तीसह प्रशिक्षक व साऱ्या सुविधा पूर्ववत होण्याची वाट पाहत आहे. व्यायामशाळेच्या काचा फुटलेल्या असल्या तरी काही युवक येथे
व्यायाम करण्यासाठी येत आहेत ही समाधानाची बाब आहे. येथे व्यायामपटूंना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. क्रीडा संकुलात धावण्यासाठी धावपट्टीवर या आणि कदाचित पडलाच तर गुडघे फोडून घेण्याची बक्षिसी मिळेल, अशी परिस्थिती आहे. या धावपट्टीवर खडे वर आलेले आहे. ठिकठिकाणी गाजरगवत व रुईची झाडंही उगवली आहे.
क्रीडा संकुलात लाइटचा पत्ता नसल्याने रात्रीच्या वेळी येथे घडणाऱ्या घटनांची चर्चा होत असते. सध्या कबड्डीसह खो-खो व इतर मैदान नेमके कोठे होते हे सध्या ओळखू येणार नाही एवढी अवस्था खराब झाली आहे.
अनेक वयोवृद्ध नागरिक फिरण्यासाठी येथे येतात, त्यांच्यासाठी क्रीडा संकुलाच्या वरच्या मजल्यावर वाचनालयाची मागणी जुनीच आहे. पण त्याबाबतही हालचाल होतानाचे चित्र दिसत नाही. क्रीडा संकुलाने कात टाकावी व पुन्हा एकदा नवं रूप घेऊन आनंद द्यावा ही अपेक्षा आहे.
स्थानिक पातळीवरून या क्रीडा संकुलाच्या जबाबदारीचा भाग उचलण्याची हिंमत कोणीतरी करावी अथवा या क्रीडा संकुलाच्या समितीवर व्यापाऱ्यांसह काही क्रीडाप्रेमी धनिक लोकांचा समावेश करावा, त्यामुळे क्रीडा संकुलाचे रूप बदलेल अशी अपेक्षा आहे. क्रीडा संकुलाची नवयोजना राबविली गेली, पण हे सांभाळण्याची जबाबदारीदेखील येवला पालिकेसह स्थानिकांना
उचलणे गरजेचे आहे. परंतु येवला पालिका या क्रीडा संकुलाकडे, ढुंकूनही पाहायला तयार नाही. स्वच्छतेचीदेखील जबाबदारी उचलत नाही हे दुर्भाग्य आहे. (वार्ताहर)