शहरात अकरावीच्या १९ हजार जागा
By Admin | Updated: June 26, 2014 00:50 IST2014-06-26T00:31:40+5:302014-06-26T00:50:04+5:30
दुपारी ३ वाजता मिळणार गुणपत्रक

शहरात अकरावीच्या १९ हजार जागा
आजपासून अकरावी प्रवेशनाशिक : गेल्या १७ रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुरुवारी मूळगुणपत्रक प्राप्त होणार असून, त्याच दिवशी म्हणजे दि. २६ पासूनच अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. शहरातील ४६ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये असलेल्या १९,७२० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, अकरावीला होणारी गर्दी लक्षात घेऊन महाविद्यालयांमध्ये पोलीस बंदोबस्ततात प्रक्रिया होणार असल्याचे समजते.
यावर्षी अनेक महाविद्यालयांनी संगणकीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्राधान्य दिले आहे, तर मविप्र संस्थेमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया होणार आहे. मविप्र संस्थेच्या जिल्ह्यातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रवेशप्रक्रिया असणार आहे. इतर महाविद्यालयांनी संगणकीय मेरीट अर्ज भरून घेण्यास प्राधान्य दिले असले तरी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत जाऊनच प्रवेशाचा अर्ज दाखल करावा लागणार आहे.
शहरातील ४६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १९,७२० इतकी प्रवेश क्षमता असून, त्यामध्ये ४६४० कला शाखा, ७२८० विज्ञान शाखा, ७३२० वाणिज्य शाखा आणि किमान कौशल्य अभ्यासक्रमाच्या ४८० जागा आहेत.
दरम्यान, विशिष्ट शाखा किंवा महाविद्यालयांसाठीच आग्रह धरणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एक समुपदेशन केंद्र स्थापन केले जाणार आहे. त्यावर तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.(प्रतिनिधी)