दिवसभरात १२६ नामांकन दाखल

By Admin | Updated: September 26, 2014 23:27 IST2014-09-26T23:26:45+5:302014-09-26T23:27:03+5:30

राजी-नाराजी, बंडखोरीला उधाण : अर्ज भरण्याची आज अखेरची तारीख

126 nominations filed throughout the day | दिवसभरात १२६ नामांकन दाखल

दिवसभरात १२६ नामांकन दाखल

नाशिक : युती - आघाडीचे फिस्कटल्याने बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या राजी-नाराजीचे जाहीर प्रदर्शन व उघड उघड बंडखोरी करीत, तर काही ठिकाणी शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून अर्ज भरण्याच्या मुदतीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातून १२६ अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या सहा दिवसांत १६९ अर्ज दाखल करण्यात आले असून, शनिवारी शेवटचा दिवस आहे.
गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्ताला सेना-भाजपा युती व कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत घटस्फोट झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये निवडणुकीची ऊर्मी आणखीनच उफाळून आली. मतविभाजन, जात-समाज व वैयक्तिक हितसंबंधांचे आडाखे बांधत प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केला, तर जागावाटपापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना काही जागांवर उमेदवारच नसल्याने त्यांनी अन्य पक्षांतील नाराजांना हेरून उमेदवारीचे बोट चाटवले. त्यामुळे शुक्रवारी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्णात राजकीय हालचाली गतिमान होऊन राजकारणाचे फासे वेगाने फिरले. त्यातूनच राजी-नाराजी, बंडखोरी व पक्षांतराची चर्चा झडली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी प्रामुख्याने कॉँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित, मनसेचे वसंत गिते, नितीन भोसले, सेनेचे धनराज महाले, अनिल कदम, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी महापौर दशरथ पाटील आदिंनी नामांकन दाखल केले. शुक्रवारी दिवसभरातून १२६ अर्ज दाखल करण्यात आले. १७१ व्यक्तींनी ३१२ अर्ज नेले. आजवर ८७२ व्यक्तींनी १५९२ अर्ज नेले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, सेना-भाजपाने अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. त्याचप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेही काही ठिकाणचे उमेदवार ठरणे बाकी आहे. त्यामुळे उद्या उमेदवारीसाठी झुंबड उडणार आहे.

Web Title: 126 nominations filed throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.