जिल्हा परिषदेत पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:07+5:302021-07-02T04:21:07+5:30
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी ...

जिल्हा परिषदेत पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश पाटील, व्ही.डी. चौधरी, एन.डी. पाडवी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात रब्बी हंगामातील तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत राज्यस्तरावर आदिवासी गटात रब्बी ज्वारीचे पीक घेत प्रथम पुरस्कार पटकावणारे खेडले, ता. तळोदा येथील शेतकरी आट्या देवजी पाडवी, व्दितीय नर्मदानगर, ता. तळोदा येथील नोवा आट्या पाडवी, तर तृतीय पारितोषिक पटकावणारे कळंबू, ता. शहादा येथील बापू नागो पवार या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गाैरविण्यात आले.
जिल्हास्तरावर सर्वसाधारण गटात गहू पिकांचे भरघोस पीक घेणारे शेतकरी चौपाळे, ता.नंदुरबार येथील छायाबाई मोहन चौधरी यांना प्रथम, ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथील सुभाष दामू पाटील यांना द्वितीय, तर बोराळा, ता.नंदुरबार येथील शांतीलाल रामदास पाटील यांना तृतीय पारितोषिक देण्यात आला. आदिवासी गटात आडगाव, ता.शहादा येथील गौतम जयराम खर्डे यांना प्रथम, चितवी, ता.नवापूर साऱ्या टेट्या गावीत यांना द्वितीय, राणीपूर, ता. शहादा येथील गियान वेडू पावरा यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. रब्बी ज्वारी सर्वसाधारण गटात सोनवद, त.श. ता.शहादा येथील विजयाबाई अशोक पाटील यांना प्रथम, प्रकाशा, ता.शहादाचे रमेश परशराम पाटील द्वितीय, तर व्दारकाबाई सोमजी पाटील यांना तृतीय पारितोषिक दिले गेले.
आदिवासी गटात रब्बी ज्वारीचे पीक घेणारे प्रथम आलेले कन्साई, ता.शहाद्याचे निर्मलाबाई दिलवरसिंग ठाकरे, व्दितीय धांद्रे बु, .ता.शहादाचे सत्तरसिंग लालसिंग वाघ, तृतीय सखाराम काशिराम भिल, सर्वसाधारण गटात रब्बी हरभऱ्याचे पीक घेणारे व स्पर्धेत प्रथम आलेले पाडळदा खु., ता.शहाद्याचे विलास बन्सी पाटील, व्दितीय ब्राह्मणपुरी ता.शहादाचे प्रकाश हिरालाल चौधरी, तृतीय सावखेडा, ता.शहादाचे अंजनाबाई चतुर पाटील.
आदिवासी गटात हरभरा पीक घेणारे प्रथम आलेले रोझवा पुनर्वसन, ता.तळोदाचे बेहऱ्या सायसिंग पावरा, व्दितीय आडगाव, ता.शहादाचे दारासिंग अरविंद रावताळे, तर तृतीय वडछिल, ता.शहादाचे सुनील राहुल्या वसावे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, जगाचा पालन पोषण करणारा जो शेतकरी आहे, तो दुर्लक्षित असल्याचे सांगून शेतकऱ्याला आत्महत्या का कराव्या लागतात याचे आत्मपरीक्षण आपण सर्वांनी केले पाहिजे. शेती हा तोट्यातला व्यवसाय झाला आहे. इतर व्यवसायात विक्रेता त्यांच्या मालांची किमत ठरवतात; मात्र शेतकरी असा एक व्यक्ती आहे की ज्याला त्याच्या मालाची किमत ठरविण्याचा अधिकार नाही ही शोकांतिका आज पहायला मिळते. शेतीसाठीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे उत्पादन व खर्च यांची सांगड घातली जात नाही. शेतकऱ्यांनी जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसोबत जोडधंदा केला पाहिजे. सर्व कृषी विभागाने शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ व सुविधा मिळवून देण्याची कृषिदिनी ग्वाही द्यावी, असे सांगितले.
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भागेश्वर यांनी शेती हीच साऱ्या उद्योगाची जननी आहे. या विचारावर वसंतराव नाईकांचा जास्त भर असल्याने त्यांनी शेती आणि शेतकरीवर्गाला समृद्ध करण्यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला बळकटी दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रदीप लाटे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांगणे यांनी, तर आभार महेश विसपुते यांनी मानले.