शेतकऱ्याच्या मदतीला धावले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:07 IST2020-04-29T16:07:36+5:302020-04-29T16:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी ...

Youths rushed to the aid of farmers | शेतकऱ्याच्या मदतीला धावले युवक

शेतकऱ्याच्या मदतीला धावले युवक

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, होतकरू तरूण आपापल्या परीने मानवधर्म निभावून मदतीचे प्रयत्न करीत आहे. गरजुंना अन्नधान्याचे कीट वाटप, भुकेल्यांना भोजन वाटप तर असहाय्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे उपक्रम गेल्या ४० दिवसांपासून सुरू आहे. सर्वच क्षेत्र संकटात सापडले असतांना याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे.
मजुरांअभावी शेतातील पीक काढायचे कसे अशा विवंचनेत असलेल्या तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकºयाला गावातील युवकांनी विनामूल्य मदत करून शेतातील संपूर्ण कलिंगड कापणी करून देत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
पिंप्री, ता.शहादा येथील शेतकरी गणेश मणिलाल पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या भितीने गावातील कोणीही शेतमजूर कलिंगड तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाते की, काय अशी भिती होती. मात्र गावातील शेतकरी व लॉकडाऊनमुळे गावी आलेल्या तरूणांनी गणेश पाटील यांना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांनी गणेश पाटील यांच्या कलिंगडचा ट्रक भरून दिला. यातून एकच संदेश जातो की, शेतकरी एकत्रित झाले तर सर्व शक्य आहे.
एकीकडे शेतमजुरांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहेत. त्यात रोजगारासाठी परराज्यात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच तालुक्यात शेतमजुरांचा प्रश्न नेहमीचाच डोकेदुखी आहे. त्यामुळे पिंप्री येथील एकतेच्या घटनेने गावोगावच्या तरूण शेतकºयांनी गट शेती योजना अंमलात आणणे काळाची गरज ठरली आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. शेतीप्रधान समाजाचामुळ शेतीनिष्ठ पाया शाबूत व मजबूत ठेवायचा असेल तर आज पिंप्रीकर तरूण बांधवांनी दाखविलेल्या सहकाराचा मुलमंत्र अन्य शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
लॉकडॉऊनमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आता शेतमजुरांअभावी सुलतानी संकटाने हैराण झाला आहे. एरव्ही सातत्याने अस्मानी संकटाचा सामना करणाºया बळीराजास सामाजिक एकतेतून मदत करीत गावातील युवकांनी पुढाकार घेत शेतातील कलिंगड तोडून ट्रक ट्रॅक्टरमध्ये भरून सहाय्य केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. 'एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीनुसार पिंप्री ता.शहादा गावातील तरुणांनी एकत्रित येत केलेले हे मनुष्यबळाचे सहाय्य निश्चितच आदर्श व अनुकरणीय आहे. तसेच भविष्यातील गट शेतीला प्राधान्य देणारे आहे.

Web Title: Youths rushed to the aid of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.