नंदुरबार : रेल्वेखाली आल्याने युवकाची मान व धड वेगळे झाल्याची घटना पाचोराबारी ते नंदुरबार दरम्यान नारायणपूर गावाच्या शिवारात घडली. मृत युवकाची ओळख पटू शकली नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, युवकाने रेल्वे रुळावर मान ठेवून धड बाहेर ठेवले असल्याने त्याची मान व धड वेगवेगळे झाल्याचा अंदाज आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अंदाजे २० वर्षे वयाचा युवक असून सडपातळ शरीर, चेहरा लांब, रंग गोरा व अंगात पांढरा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. २३ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. उधना-दानापूर रेल्वे येत असतांना नारायणपूर शिवारातील रेल्वे ट्रॅकवर युवकाने मान रेल्वेरुळावर ठेवली. त्याचवेळी आलेल्या एक्सप्रेसने त्याची मान चिरडली. त्यात मान व धड वेगळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रेल्वे ट्रॅकमॅन अयुबखान इस्माईल खान यांनी याबाबत माहिती दिल्याने उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार राम वळवी करीत आहे.
मृत युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन उपनगर पोलिसांनी केले आहे.