अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:20+5:302021-06-20T04:21:20+5:30

आष्टे : राज्य शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीज ...

You will get a new household electricity connection as soon as you apply | अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीज जोडणी

आष्टे : राज्य शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीज जोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच नवीन घरगुती वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्जांची सोय करण्यात आली आहे. घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, ही रक्कम पाच समान मासिक हप्त्यांमध्ये वीज बिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. महावितरणकडून वीज जोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास १५ दिवसात वीज जोडणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी किंवा कृषी आकस्मिता निधी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च करण्यात येईल. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीज जोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र सोबत जोडावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे अनेकांना अर्ज करताच तत्काळ वीज जोडणी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

वीज बिलाची पूर्वीची थकबाकी नसावी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करणाऱ्या अर्जदारांकडे वीज बिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज संच मांडणीचा अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या योजनेविषयी माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याचे महावितरणच्या नंदुरबार परिमंडळाकडून सांगण्यात आले आहे.

या योजनेमुळे गरजू नागरिकांना तत्काळ वीज जोडणी मिळणार आहे. महावितरणच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचेही महावितरणच्या नंदुरबार परिमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: You will get a new household electricity connection as soon as you apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.