जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून यंदाही दहा लाखाच्या टप्प्यात उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST2021-05-18T04:31:29+5:302021-05-18T04:31:29+5:30

नंदुरबार : खान्देशात यंदाही सर्वाधिक कारखाने व सर्वाधिक साखर उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातच झाले. तीन कारखान्यांनी तब्बल नऊ लाख ५७ ...

This year too, the production from the sugar factories in the district is in the phase of ten lakhs | जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून यंदाही दहा लाखाच्या टप्प्यात उत्पादन

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून यंदाही दहा लाखाच्या टप्प्यात उत्पादन

नंदुरबार : खान्देशात यंदाही सर्वाधिक कारखाने व सर्वाधिक साखर उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातच झाले. तीन कारखान्यांनी तब्बल नऊ लाख ५७ हजार ११३ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यंदा खान्देशातील केवळ चारच कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांचा समावेश होता. दरम्यान, येत्या साखर हंगामासाठी ऊस लागवड वाढल्याने साखर उत्पादन देखील ११ लाख क्विंटलपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तिन्ही साखर कारखान्यांनी नियोजन केेले आहे.

खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पूर्वी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात खान्देशात सर्वाधिक साखर उत्पादन होत होते. परंतु कालांतराने धुळे जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने, जळगाव जिल्ह्यातील चार साखर कारखाने बंद पडल्याने साखर उत्पादन घटले. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहिले असून दरवर्षी साखर उत्पादन घेत आहेत. यंदा देखील तिन्ही कारखान्यांतर्फे दहा लाखाच्या टप्प्यात साखर उत्पादन घेण्यात आले.

तिन्ही कारखाने नियमित सुरू

जिल्ह्यात पूर्वी केवळ शहादा येथील सातपुडा साखर कारखाना होता. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला. कालांतराने त्याचे खाजगीकरण झाले. आता तो आयान शुगर लिमिटेड म्हणून ओळखला जातो, तर तिसरा साखर कारखाना हा नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे. काही काळ वगळता हे तिन्ही साखर कारखाने नियमितपणे सुरू आहेत. खान्देशातील धुळे व जळगाव जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बंद पडले असताना नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने नियमितपणे सुरू असून उत्पादन देखील घेतले जात आहे.

दोन वर्षांपासून दहा लाखाचा टप्पा

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जवळपास दहा लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. यंदा नऊ लाख ५७ हजार क्विंटल, तर गेल्यावर्षी दहा लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले होते. यंदा सर्वाधिक साखर उत्पादन हे आयान शुगर कारखान्याने केले आहे. अवघे ७९ दिवस गाळप करून त्यांनी चार लाख ४३ हजार १३० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. त्याखालोखाल शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याने १५१ दिवस गाळप करून चार लाख ४६ हजार ३४५ क्विंटल साखर उत्पादन केले, तर आदिवासी साखर कारखान्याने १०९ दिवस गाळप करून एक लाख १४ हजार ७४५ क्विंटल साखर उत्पादन घेतले.

पुढील हंगामात मुबलक ऊस

गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पर्जन्यमान असल्याने जिल्ह्यात उसाची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे येत्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तिन्ही कारखाने गाळपाच्या पूर्वतयारीला जून महिन्यापासून सुरुवात करणार आहेत. त्यादृष्टीने कारखान्यांनी नियोजन केले आहे.

पुढील हंगामात जिल्ह्यात जवळपास २० हजार एकर क्षेत्रात ऊस उपलब्ध राहणार आहे. सातपुडा साखर कारखान्यातर्फे सभासद शेतकऱ्यांना ऊस लागवड व विविध किडी आणि रोगांसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.

कोरोनाचा परिणाम नाही

गेल्यावर्षी व यंदा देखील कोरोना काळातच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा समारोप करण्यात आला होता. असे असले तरी कोरोनामुळे एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहिला नव्हता. नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले गेले होते.

Web Title: This year too, the production from the sugar factories in the district is in the phase of ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.