जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 13:28 IST2021-02-02T13:24:52+5:302021-02-02T13:28:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : तापीवरील २२ उपसा जलसिंचन योजनाच्या दुरूस्ती कामासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू ...

Written assurance of the Collector that the Jalasamadhi agitation was immediately postponed; Promise to follow up for works | जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित

जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : तापीवरील २२ उपसा जलसिंचन योजनाच्या दुरूस्ती कामासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावरून देखील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्रान्वये दिल्याने उपसा सिंचन योजना जलसंघर्ष समितीचे सोमवारचे नियोजित जलसमाधी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, प्रकाशा बॅरेज परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला    होता.
            तापीवरील २२ उपसा जल सिंचन योजनेच्या दुरूस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. दोन्ही बॅरेजमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. परंतु निधीचा प्रश्र्न आणि इतर कारणांमुळे अद्यापही दुरूस्तीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. याबाबत संघर्ष समितीने सोमवार, १ रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. 
सकाळी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी तापी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संघर्ष  समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलेल्या आश्वासनाचे लेखी पत्र समितीला देण्यात आले.
             त्यात म्हटले आहे की, उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीच्या प्रस्तावित कामांच्या  प्रशाससकीय मान्यतेसाठी शासनास प्रस्ताव       सादर करण्यात आला आहे.   त्याबाबत योजनेच्या कामकाजाशी संबधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता पाठपुरावा करीत आहेत. 
योजनेची कामे पुर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले. या पत्राच्या आधारे अधिकारी व समिती पदाधिकारी यांनी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले. 
आंदोलकांना पोलीस प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आली  होती. त्यात १ फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत कुठलेही सभा आंदोलन करू नये. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करू नये त्याचप्रमाणे मुंबई पोलीस कायदा चे पालन करावे, अन्यथा आपल्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल असे बजावण्यात आले होते. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.      त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. रात्रीपासूनच अधिकारी वर्ग येथे दाखल होता. 

आंदोलनात या शेतक-यांचा होता सहभाग...
आंदोलन करणाऱ्या १२ शेतकऱ्यांमध्ये समितीचे अध्यक्ष दिपक पुरुषोत्तम पाटील(लोणखेडा) यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष जिजाबराव गोरख पाटील (धमाणे), विजय महेंद्रलाल गुजराथी (कोपर्ली), यशवंत लिमजी पाटील(कहाटुळ), राजाराम दगडू पाटील (कहाटुळ), रविंद्र उत्तम पाटील (कहाटुळ), संजय लक्ष्मण पाटील (शिरुड), रितेश खेमराज बोरसे(कळंबू), विनोद चिंतामण पाटील(पुसनद), राजाराम सखाराम चौधरी(लहान शहादे), यशवंत जगन्नाथ पाटील (लहान शहादे), रविंद्र शंकर पाटील(शिंदे) व राजेंद्र विलास पाटील (खोडसगांव) यांचा समावेश होता.

Web Title: Written assurance of the Collector that the Jalasamadhi agitation was immediately postponed; Promise to follow up for works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.