अधिपरिचारीकांबाबत शासनाचा दुजाभावमुळे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:34 IST2020-06-09T11:31:02+5:302020-06-09T11:34:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध मागण्यांसाठी बंधपत्रीत अधिपरिचारिकांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. या ...

अधिपरिचारीकांबाबत शासनाचा दुजाभावमुळे कामबंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विविध मागण्यांसाठी बंधपत्रीत अधिपरिचारिकांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास सामुहिक विनावेतन रजेवर जाऊन साखळी उपोषणाचा इशारा आंदोलक अधीपरिचाकांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षासाठी बंधपत्र नियमित वेतनानुसार पुर्ण करून दिले आहे. त्यानंतर पुढे ११ महिने याप्रमाणे सर्व अधिपरिचारीका कार्यरत होते. त्यानंतर ११ महिन्यांऐवजी ६ महिने बंधपत्र करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून सेवा बजावली जात आहे. असे असतांना अचानक सेवार्थ प्रणालीमधून वगळून मानधनावर ठेवले जात आहे.
बंधपत्रधारक अधिपरिचारिका कोवीड-१९ मध्ये नियमाप्रमाणे आणि समर्पण भावाने काम करीत आहेत. असे असतांनाही मानधन आता कमी करण्यात आले आहे. २०१५ पर्यंतच्या बंधपत्रधारक परिचारिकांना नियमित सेवेत सामावून घेतले आहे. त्याअनुषंगाने आम्हालाही नियमित शासन सेवेत सामावून घ्यावे.
सरळ सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत सहा महिन्याऐवजी ११ महिन्याचे आदेश मिळावे. वार्षीक वेतनात १० टक्के वाढ मिळावी. सातवा वेतन लागू झाला तेंव्हापासून आतापर्यंतचा फरक मिळावा. मानधन पद्धतीचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्या यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुपारनंतर परिचारिका कामावर आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनामुळे बंधपत्रधारक परिचारकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले गेल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.