कलसाडी ते मालकातर रस्त्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:18+5:302021-02-23T04:48:18+5:30
बंधाऱ्यापासून आलेल्या पाटचारीच्या मधोमध केले जात असल्याने या पाटचारी आपले अस्तित्व गमावून बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात ...

कलसाडी ते मालकातर रस्त्याचे काम सुरू
बंधाऱ्यापासून आलेल्या पाटचारीच्या मधोमध केले जात असल्याने या पाटचारी आपले अस्तित्व गमावून बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डोंगरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठते अक्षरशः हा संपूर्ण रस्ता जलमय होऊन पूरस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते. हा शहादेकरांचा नेहमीचा अनुभव आहे. कवळीथ बंधाऱ्यातील पाटचाऱ्यांचे नियमितपणे खोलीकरण होत नसल्याने पावसाळ्यात शहादेकरांना हा त्रास सोसावा लागतो, अशा परिस्थितीत या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारामार्फत पाटचाऱ्यांच्या मधोमध गटारींची निर्मिती करण्यात येत असल्याने भविष्यात पावसाळ्यात भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला या पाटचाऱ्या असून, त्याची जागा सोडल्यानंतर त्या भागात गटारी करणे आवश्यक आहे. मात्र ठेकेदाराने या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याने थेट शहादा शहर ते डोंगरगाव व गोगापूर फाट्यापर्यंत सुमारे १५ किलोमीटरची पाटचारी ठेकेदारामार्फत बुजवली गेली आहे
या रस्त्याचे काम करताना शहादा नगरपालिका पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग या तिघा विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. मात्र पाटचाऱ्यांच्या मधोमध गटारीचे काम होत असताना पाटबंधारे विभागाने याची चौकशी केलेली नाही किंवा हरकत ही घेतलेली नाही तर दर पावसाळ्यात या ठिकाणी संपूर्ण परिसर जलमय होत असताना शहादा पालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना ठेकेदाराला असे का करतो असा जाबही विचारला नाही. परिणामी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कवळीथ बंधाऱ्यापासून आलेले पाटचारी भविष्यात आपोआप अस्तित्व गमावणार असल्याची वेळ निर्माण झाली आहे व याचा मोठा त्रास शहादेकरांना सोसावा लागणार असून, ज्या पद्धतीने गटारीची निर्मिती करण्यात येत आहे. त्या गटारींमधून पावसाळ्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सहजरीत्या वाहून जाणार नसल्याने भविष्यात या ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. यासाठी या तिन्ही विभागाने एकत्रित पणे बैठक घेऊन पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे.
डोंगरगाव चौफुलीपासून पुढे मालकातर गावापर्यंत काही ठिकाणी या रस्त्याचे काम एका बाजूने तर काही ठिकाणी दोन्ही बाजूने पूर्ण झालेले आहे. डांबरीकरणाचा थर टाकण्यात आलेला आहे. मात्र रस्ता निर्माण करताना रस्त्या खालील मातीचे योग्य ते परीक्षण केले गेले नसल्याने रस्ता निर्माण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे तर डांबरीकरण उखडून निघाले आहे. यावरून कामाचा दर्जा किती उत्कृष्ट आहे हे स्पष्ट होते. ठेकेदारामार्फत खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याला पॅचेस मारण्यात आले आहे, ठिगळं जोडण्यात आलेले आहे. मात्र यावरून हा रस्ता हस्तांतरित झाल्यानंतर भविष्यात खरोखरच या पुढील १० वर्षांच्या काळासाठी योग्य दर्जाचा राहील यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहादा पालिका प्रशासन पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग यांचे एकत्रितपणे या रस्त्याची संपूर्ण तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना आजच करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शहादेकरांना पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता जाणकारांमार्फत वर्तविली जात आहे.