खरिपाच्या पेरणीसाठी कामे आटोपली, आता मृगाच्या पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:10+5:302021-06-20T04:21:10+5:30
वडाळी महसूल मंडळात बामखेडा, तोरखेडा, वडाळी, हिंगणी, फेस, दोंडवाडे, काकर्दा, कोंढावळ, जयनगर, मातकूट, बोराळा, खैरवे, भडगाव आदी २० ...

खरिपाच्या पेरणीसाठी कामे आटोपली, आता मृगाच्या पावसाची प्रतीक्षा
वडाळी महसूल मंडळात बामखेडा, तोरखेडा, वडाळी, हिंगणी, फेस, दोंडवाडे, काकर्दा, कोंढावळ, जयनगर, मातकूट, बोराळा, खैरवे, भडगाव आदी २० ते २५ गावांचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली आहे. मागील खरीप हंगामात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. पण यंदा कापसाचे क्षेत्र घटणार आहे, असे शेतकरी व कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. ऊस, पपई, केळी व कांदा या पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यामध्ये एकूण पेरणी क्षेत्राच्या कापूस लागवडीबरोबरच बाजरी, ज्वारी, मूग, तूर, भुईमूग, तीळ, उडीद, मका अशी लागवडीखालील कमी पाणी लागणारी पिकेही राहू शकतात, असा अंदाज कृषी विभागाने दिली आहे.
कृषी विभागातर्फे योजनांची माहिती
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना गावोगावी प्रत्यक्ष शेतावर, गाव चावडीवर बीज प्रक्रिया, विकेल ते पिकेल, एक गाव एक वाण, जमीन सुपिकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर, घरगुती बियाणे, उगवण क्षमता तपासणी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महाडीबीटी योजना, तसेच बांधावर खत, बियाणे वाटप, अनुदानावर सुधारित, संकरित बियाणे वितरणाबाबत कृषी विभागामार्फत माहिती दिली जात आहे. मंडळातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
खरीप हंगामाची पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी पेरणी करतो. यामध्ये शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, खते यांची निवड करून कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घ्यावी. घेतलेले बियाणे उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करावी व पुरेशी ओल म्हणजे ७५ ते १०० मिमी चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी.
- किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा