राष्ट्रवादीची नवीन ‘इनिंग’ची दिशा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:47+5:302021-02-09T04:34:47+5:30

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने लडखळलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आता नव्यानेच नियुक्त करण्यात ...

This will be the direction of the new innings of the NCP | राष्ट्रवादीची नवीन ‘इनिंग’ची दिशा ठरणार

राष्ट्रवादीची नवीन ‘इनिंग’ची दिशा ठरणार

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने लडखळलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आता नव्यानेच नियुक्त करण्यात आले असून, प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत त्याचा आढावा मांडणार आहे. त्यामुळे २०१९ मध्ये एकाही मतदार संघात निवडणूक न लढविणाऱ्या या पक्षातर्फे आगामी निवडणुकीची दिशा कशी असेल याबाबत राजकीय गटात उत्सुकता लागून आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सन २००० ते २०१४ या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काहीशी भक्कम होती. जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचे पक्ष म्हणून या पक्षाची वाटचाल सुरू होती. मात्र ज्येष्ठ नेते व माजीमंत्री डाॅ.विजयकुमार गावीत यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पक्षाची स्थिती डळमळली. २०१४ च्या निवडणुकीच्या तोंडावरच डॉ.गावीत यांनी पक्षांतर केल्याने त्या निवडणुकीत हा पक्ष गोंधळला होता. त्यामुळे आघाडीच्या वाट्यात राष्ट्रवादीकडे तळोदा-शहादा व नंदुरबार हे दोन विधानसभा मतदारसंघ आले होते. मात्र दोन्ही ठिकाणी पक्षाचा पराभव झाला. पुढे २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी राजीनामा देऊन त्यांनीही भाजप व काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसची फजिती उडाली होती. म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्ह्यातील चार पैकी एकही मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता गेल्या चार महिन्यांपासून नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. डॉ. अभिजित मोरे या तरुण नेतृत्वाची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या चार महिन्यांपासून नव्या पदाधिकाऱ्यांनी विविध आंदोलन व सामाजिक कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते या पक्षात प्रवेश करतील, अशी अपेक्षा लागून आहे. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी प्रवेश केला असून, ते शहाद्यातून निवडणूक लढवतील, अशी चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे १० फेब्रुवारीला जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा हा दौरा फक्त नंदुरबार येथेच असून, याच ठिकाणी ते जिल्ह्यातील चारही मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून त्या त्या मतदारसंघाचा आढावा जाणून घेणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी ते ४५ मिनिटे देणार आहेत. वास्तविक शेजारच्या धुळे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ते प्रत्यक्ष भेट देणार असताना नंदुरबारला मात्र एकाच ठिकाणी चारही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अर्थातच नवीन पक्षाच्या बांधणीनंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष येत असल्याने या बैठकीत आगामी राजकारणाची दिशा ठरणार असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची दिशा व धेारण कसे राहील याबाबत सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: This will be the direction of the new innings of the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.