मोजमाप केल्यानुसार रुंदीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:41+5:302021-02-09T04:34:41+5:30
कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गावांमध्ये अपघात घडू नये, यासाठी ३० मीटर रुंदीकरणासह दुभाजक ...

मोजमाप केल्यानुसार रुंदीकरण करावे
कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गावांमध्ये अपघात घडू नये, यासाठी ३० मीटर रुंदीकरणासह दुभाजक उभारण्यात येत आहेत. परंतु, ब्राह्मणपुरी गावातही या कामासाठी नियोजित ३० मीटर मोजमाप करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कमी अंतराचा रस्ता बनविण्यात आला आहे. यामुळे अपघात घडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
अवजड वाहनांची वाहतूक
शहादा तालुक्यातील शहादा-खेतिया हा अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यांतील वाहतूक सुरू असते. केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मालाची वाहतूक शहादा-खेतिया मार्गावर मोठ्या प्रमाणावर होते. अनुषंगाने ब्राह्मणपुरी गावात दुभाजक निर्माण करून रस्ता रुंदीकरण करणे अपेक्षित आहे.
गटारांची दुरवस्था
ब्राह्मणपुरी गावातून जाणाऱ्या कोळदा-खेतिया रस्त्याचे काम खोलीकरण करून करण्यात आले. परंतु, रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची या कामामुळे दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात गावातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या गटारांची दुरवस्था झाल्याने योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाण्याची डबकी साचतात. गटारे दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी संबंधित रस्ता रुंदीकरण करीत असलेल्या ठेकेदाराशी संपर्क केला असता संबंधित ठेकेदाराने नियोजित ३० मीटर रस्ता रुंदीकरण होईल, तेव्हा गटारांचे नव्याने बांधकाम करू, असे सांगण्यात आले.
नुकसानभरपाईची अपेक्षा
ज्या गावातून रस्ता जात आहे, त्या गावातील रस्त्यावरील घरे पाडण्यात येत आहेत. परंतु, ब्राह्मणपुरी गावात रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम सुरू करून रुंदीकरणासाठी करण्यात आलेली पिवळी खूण करण्यात आली होती. संबंधित ठेकेदाराकडून पिवळ्या खुणेला झुगारून रस्ता रुंदीकरण कमी प्रमाणात करण्यात आले व साइडपट्ट्यादेखील भरण्यात आल्या नाहीत. जर साइडपट्ट्यांचा भराव केला नाही? तर रस्ता रुंदीकरण होईल का, असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून ग्रामपंचायत, रस्त्यावरील घरांचे मालक यांना काहीही पत्र दिले नसल्याने घरे पडणार आहेत की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर घरे पाडतील तर राहायला जायचे कुठे? कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ तर नाही येणार ना? असे विविध प्रश्न निर्माण होत आहे.