माय या पोरेसन काय व्हई, कईन या शाळा चालू व्हतीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST2021-07-03T04:19:55+5:302021-07-03T04:19:55+5:30
१७ महिने उलटून चालले तरी अजूनही प्राथमिक शाळा चालू झालेली नाही. तिसरी लाट उंबरठ्यावर असल्यामुळे शासनाने अजूनही शाळा चालू ...

माय या पोरेसन काय व्हई, कईन या शाळा चालू व्हतीन
१७ महिने उलटून चालले तरी अजूनही प्राथमिक शाळा चालू झालेली नाही. तिसरी लाट उंबरठ्यावर असल्यामुळे शासनाने अजूनही शाळा चालू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वर्ष उलटून गेले तरीही लहान बालके घरातच असल्याने त्यांचे आई-वडील त्यांची शाळा केव्हा चालू होईल? अशा विचारात असून, मुले घरी राहून आता खूपच खोडकरपणा करायला लागल्यामुळे आई-वडीलही त्यांच्या भविष्याच्या चिंतेत आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर या शैक्षणिक वर्षात तरी प्रत्यक्षात शाळा चालू होतील, असे पालकांना वाटत होते. मात्र तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक राहील, असे भाकीत वर्तविले आहे. यामुळे सध्या तरी शासनाने प्रत्यक्ष शाळा चालू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी मुले शाळेत गेली नसल्याने केवळ खेळून - खेळूनही मुले बोर झाली आहेत. तसेच घरात मुले आई-वडील, आजी-आजोबांजवळ दिवसभर राहिल्यामुळे मुलांना ना अभ्यास, ना ट्युशन, ना शाळा त्यामुळे मुले केवळ मस्ती आणि टीव्ही पाहत असल्यामुळे पालक कंटाळले आहेत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, ते मुलं ऑनलाईन क्लास जॉईन करून घेत असतात. मात्र ज्या पालकांकडे स्मार्ट फोन नाही, त्यांची मुले केवळ दिवसभर खेळ खेळण्यात तसेच आई - वडिलांजवळ व खोडकरपणा करण्यात आपला वेळ घालवत आहेत. सुरुवातीला कोणतीही गोष्ट थोडी बरी वाटते. मात्र केवळ खेळ - खेळून तसेच रिकामे राहून मुले तर कंटाळली आहेत. पण केवळ घरीच राहिल्यामुळे मुलांच्या वर्तणुकीतही बदल झाला आहे. त्यामुळे पालकही आता त्रासले आहेत.
मुले प्रत्यक्षात शाळेत गेल्यावर शिक्षकांचा धाक असल्यामुळे ते घरी थोडाफार अभ्यास करत असतात. मात्र सध्या ऑनलाईनमुळे प्रत्यक्षात शिक्षकांचा धाक नसल्यामुळे मुले ऑनलाईनचा अभ्यासही करण्यास टाळाटाळ करीत आहेत. शिवाय ज्या मुलांकडे ऑनलाईनसाठी स्मार्टफोन नाही, त्या मुलांना तर आपल्याला काय अभ्यास दिला आहे? हेही कळत नाही. म्हणून त्यांचा अभ्यास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा मुलांना पालकांनी काही तरी अभ्यास सांगितला तरी ते त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. आणि दिवसभर खेळ खेळण्यात अथवा खोडकरपणा करण्यात व्यस्त असतात.
शिकलेली आई घराला पुढे नेई असे म्हणतात. मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे. पैसेवाली आई घरा दाराला पुढे नेई, असे सध्याचे चित्र दिसत आहे. कारण ज्या कुटुंबात स्मार्टफोन आहेत, त्यांची मुले ऑनलाईन क्लास जॉईन करत असून, शिक्षकांनी शिकविलेले थोडेफार त्यांच्या बुद्धीत बसत आहे. मात्र ज्या कुटुंबात स्मार्टफोन नाही, त्यांची मुले या ऑनलाईन शिक्षणापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या कुटुंबात स्मार्टफोन नसल्यामुळे ऑनलाईन म्हणजे काय? हेसुद्धा त्यांना समजणे मुश्कील झाले आहे. म्हणून अशा गरीब कुटुंबात स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांची आई जरी शिकलेली राहिली तरी सध्या ऑनलाईनच्या जमान्यात गरीब कुटुंबातील शिकलेली आई स्मार्टफोनअभावी घरादाराला पुढे कशी नेईल? असा प्रश्न सध्या तरी गरीब कुटुंबातील पालकांना सतावत आहे.
प्रत्यक्षात शाळा चालू होत्या तेव्हा मुलांच्या तोंडून अभ्यास, होमवर्क, ट्युशन, वही-पेन, पुस्तक असे शब्द ऐकायला मिळत होते. मात्र आता एक वर्ष उलटून गेला तरी मुले शाळा बंद असल्यामुळे घरीच असल्याकारणाने त्यांच्या जागेवर सॅनिटायझर, कोरोना, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, लस असे शब्द ऐकायला भेटत आहेत. म्हणून केव्हा शाळा चालू होतील आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल. या विचारांनी आम्ही त्रस्त आहोत. - सुशीलाबाई हरी पाटील, जयनगर.