पोलिसांना कसले नियम? ठाण्यासमोर भररस्त्यावर होते वाहनांची ‘पार्किंग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:17+5:302021-06-30T04:20:17+5:30
नंदुरबार : शहरात एकूण चार पोलीस ठाणी आहेत. यातील एक पोलीस ठाणे हे शहराबाहेर सुसज्ज अशा इमारतीत तर तीन ...

पोलिसांना कसले नियम? ठाण्यासमोर भररस्त्यावर होते वाहनांची ‘पार्किंग’!
नंदुरबार : शहरात एकूण चार पोलीस ठाणी आहेत. यातील एक पोलीस ठाणे हे शहराबाहेर सुसज्ज अशा इमारतीत तर तीन पोलीस ठाणी शहरातील मध्यवर्ती भागात आहेत. या पोलीस ठाण्यांमध्ये पार्किंग करण्यासाठी मनाई असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि येथे येणारे नागरिक बाहेर वाहन पार्किंग करत आहेत. यातून या पोलीस ठाण्यांबाहेरच बेशिस्ती दिसून येत आहे.
शहरातील तीन पोलीस ठाणे परिसरात भेटी दिल्या असता, पोलीस ठाण्याच्या आवारात वाहने लावण्यास जागा नसल्याने बाहेरच वाहने लावल्याचे दिसून आले. शहरात २०२०-२०२१ या वर्षात नो पार्किंगच्या दीड हजार केसेस करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी नो पार्किंगच्या कारवाया मात्र शहरात खूप अशा होत नव्हत्या. परंतु यंदाच्या वर्षात कोरोनामुळे बाजारात वेळोवेळी होणारी गर्दी वाहतूक कोंडी करणारी ठरत असल्याने या कारवायांना गती देण्यात आली होती.
ज्या ठिकाणी नो पार्किंग त्या ठिकाणीच होतेय वाहनांची पार्किंग
शहरातील नेहरू चाैकात शहर पोलीस ठाणे आहे. या ठिकाणी पूर्वी तहसील कार्यालय होते. हीच जागा आता पोलीस ठाण्याला दिली आहे. दरम्यान, या ठिकाणी पार्किंगला जागा नसल्याने वाहने बाहेर लावली जातात. विशेष म्हणजे समोरील भिंतीवर नो-पार्किंगची सूचना केली गेली आहे.
शहर वाहतूक शाखेचे कार्यालय आता शहर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी जागा नसल्याने कर्मचारी वाहने बाहेरच लावतात. वाहतूक शाखेची वाहनेही बाहेरच उभी राहतात.
शहर पोलीस ठाणे
शहर पोलीस ठाणे हे सर्वाधिक व्यस्त पोलीस ठाण्यांपैकी एक आहे. नेहरु चाैकातील हमरस्त्याला लागून हे ठाणे आहे. या ठिकाणी बाहेरच भिंतीसमोर वाहने लावली जातात. यातून कधीकधी येथे वाहतूक कोंडी होते.
वाहतूक शाखा
वाहतूक शाखेकडे चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. गांधीपुतळा रोडवरील या ठाण्याबाहेर कर्मचारी व अधिकारी त्यांची वाहने उभी करतात. यातून येथेही वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
नंदुरबार शहरात नो पार्किंगच्या कारवाया केल्या जात आहेत. २०१६ ते २०२१ या काळात १ हजार ६०२ कारवाया झाल्या आहेत. यात सर्वाधिक कारवाया ह्या २०२०-२१ या वर्षातील आहेत. येत्या काळातही कारवाई सुरु ठेवणार आहोत.
-अविनाश मोरे
पोलीस निरीक्षक, नंदुरबार.