राज्यातील ‘साडेआठ लाख’ बालकांचे ‘वेट लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:46 IST2020-05-15T12:46:27+5:302020-05-15T12:46:37+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या सध्या बंद असल्याने दोन महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकांची ...

Weight locks of 'eight and a half lakh' children in the state | राज्यातील ‘साडेआठ लाख’ बालकांचे ‘वेट लॉक’

राज्यातील ‘साडेआठ लाख’ बालकांचे ‘वेट लॉक’


रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या सध्या बंद असल्याने दोन महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकांची वजन-उंची घेण्याची प्रक्रिया थांबली आहे. विशेषत: मार्च ते मे हा कुपोषणाचा हॉट पिरीयड मानला जातो. याच काळात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण व देखभालीच्या प्रक्रियेलाही मर्यादा आल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे गेल्या पावणेदोन महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. साहजिकच सर्वच व्यवहार बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांप्रमाणे अंगणवाड्याही बंद आहेत. खास करून अंगणवाड्यातील बालकांवर मार्च ते जून या काळात अधिक लक्ष केंद्रीत करावे लागते. याच काळात कुपोषणाचे प्रमाणही वाढत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अशा स्थितीतच कोरोनामुळे दोन महिन्यांपासून अंगणवाडींमधील बालकांचे वजन घेणे, उंची मोजणे तसेच रोजचा पोषण आहार, आरोग्य तपासणी व इतर उपाययोजना सर्वच बंद झाले आहे. काही प्रक्रिया सुरू असल्या तरी त्या अनियमित झाल्या आहेत.
राज्यात अंगणवाडींमध्ये जवळपास साडेआठ लाखांपेक्षा अधिक बालकांचे नियमित वजन घेतले जाते. दर महिन्याला बालकांची वजन व उंची मोजून त्यानुसार सॅम आणि मॅमच्या बालकांचा दर्जा ठरवला जातो. कमी वजन असलेल्या बालकांची विशेष काळजी घेऊन त्याचे वजन कसे वाढेल याकडे लक्ष घातले जाते. कुपोषित बालकांना सर्वसाधारण बालकांच्या गटात आणण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात सद्यस्थितीत अतीतिव्र कुपोषित ४१ हजारपेक्षा अधिक बालके आहेत. तर मध्यम कुपोषित दीड लाखाहून अधिक बालके आहेत. शिवाय सर्वसाधारण गटात साडेसहा लाखाहून अधिक बालके आहेत. या बालकांवरील प्रशासनाचे नियंत्रण गेल्या दोन महिन्यांपासून दुरावले आहे. लॉकडाऊनमुळे पोषण आहारचा पुरवठा बालकांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचा दावा प्रशासनाचा असला तरी दुर्गम-अतिदुर्गम भागात तो सर्वांपर्यंत पोहोचला की नाही, पोहोचला असेल तर घरी या बालकांना अंगणवाडीमध्ये जसा नियंत्रित पद्धतीने आहार दिला जातो तसा दिला गेला की नाही? बालकाच्या वयोमानाच्या टप्प्यावर दिले जाणाऱ्या लसी दिल्या गेल्या नाहीत, यावेळी अंगणवाडीत बालकाच्या आरोग्याच्या तपासणीबाबत निर्णय होतो ती प्रक्रिया थांबली आहे. अशा कितीतरी कारणांमुळे बहुतांश बालके कमी वजनाच्या गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्यांमधील वजन व उंची घेण्याचे काम बंद आहे़ तसेच दरवर्षी एप्रिल महिन्यात नवीन बालकांचे सर्वेक्षण केले जाते़ ते कामही यंदा होवू शकलेले नाही़ राज्यशासनाचे नुकतेच अंगणवाडी केंद्र क्वारंटाईन कक्षासाठी वापरु नये असे आदेश आले आहेत़ बालकांचे वजन व उंची सध्याच्या परिस्थितीत कशा प्रकारे घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त होताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली़


 

Web Title: Weight locks of 'eight and a half lakh' children in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.