तळोद्यात पार पडले बॅण्डविना लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:06 PM2019-12-13T12:06:53+5:302019-12-13T12:07:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : लग्नकार्यासाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्यासाठी तळोद्यात माळी समाजातर्फे अनावश्यक खर्चाचा उपक्रम बंद करण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : लग्नकार्यासाठी होणारा अवास्तव खर्च कमी करण्यासाठी तळोद्यात माळी समाजातर्फे अनावश्यक खर्चाचा उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे पालन करीत बॅँडविना लग्न पार पाडणाऱ्या वधू व वर नित्यांचा सत्कार करण्यात आला.
समाज एक असला तरी समाजातील बहुतांश कुटुंब हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात. अशा कुटुंबांना मुला-मुलींचे लग्न जुळवून देण्यासाठी करावा लागणारा अनावश्यक खर्च परवडत नाही. त्यासाठी कुटुंबाला कर्जबाजारी देखील व्हावे लागते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी माळी समाजाने मागील महिन्यात सभा घेत लग्नातील अनावश्यक खर्च कमी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यात लग्नाच्या आधी बॅँड न बाजविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.
समाजाच्या या निर्णयाचे पालन करीत तळोदा शहरातील चेतना अजित पवार व परेजकुमार प्रभाकर टवाळे यांचे लग्न ठरलेल्या वेळेतच पार पडले. परंतु हे लग्न लावतांना वधू व वरपित्यांकडून बॅँडचा फारसा अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे समाजामार्फत घेण्यात आलेल्या ठरावानुसार दोन्ही मंडळींकडून या लग्नात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निर्णयाचे अन्य समाजाकडूनही कौतुक करण्यात आले होते. या लग्नाच्या माध्यमातून समाजाने घेतलेल्या निर्णयांचे पालन केले म्हणून वधू व वरपित्यांचा माळी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे, लक्ष्मण माळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोविंद पाटील, व्यवस्थापक संजय चौधरी आदी उपस्थित होते.