कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पाणीटंचाई निवारणाची कामे अद्यापही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST2021-06-21T04:21:09+5:302021-06-21T04:21:09+5:30

नंदुरबार : ऐनउन्हाळ्यात कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या कामांवर परिणाम झाला. त्यामुळे पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई निवारणाची ...

Water scarcity relief work is still going on due to corona and lockdown | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पाणीटंचाई निवारणाची कामे अद्यापही सुरूच

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पाणीटंचाई निवारणाची कामे अद्यापही सुरूच

नंदुरबार : ऐनउन्हाळ्यात कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या कामांवर परिणाम झाला. त्यामुळे पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई निवारणाची कामे अनेक ठिकाणी सुरूच असल्याचे चित्र आहे. विशेषत: दुर्गम भागात विंधन विहिरींवर हातपंप बसविण्याच्या कामांचा सर्वाधिक समावेश असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यंदा अर्थात नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या काळात ९० गावे व २१४ पाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यासाठी एक कोटी ८० लाख रुपयांच्या टंचाई निवारण कामांचे नियोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या जवळपास ९० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी शक्यता होती; परंतु सर्वच भागांत पावसाची सरासरी कमी-जास्त असल्यामुळे काही भागांत टंचाईच्या झळा बसल्या. त्यात सर्वाधिक ३९ गावे ही नंदुरबार तालुक्यात होती, तर सर्वाधिक १८७ पाडे धडगाव तालुक्यातील होती.

यासह इतर तालुक्यांमधील गावांचादेखील त्यात समावेश होता. ऐनउन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उपाययोजनांच्या कामांवर परिणाम झाला आणि ती रखडली. विशेषत: विंधन विहिरींच्या कामांचा त्यात समावेश होता.

३८ ठिकाणी अधिग्रहण

खासगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण हे जिल्ह्यात ३८ ठिकाणी करण्यात आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक ३१, तर नवापूर तालुक्यात ४, तळोदा तालुक्यात एक व धडगाव तालुक्यात दोन ठिकाणांचा समावेश होता.

दोन लाख लोकांना झळ

यंदा पाणीटंचाईची दोन लाख जणांना झळ बसली. त्यात नंदुरबार तालुक्यातील ८३ हजार २२७, नवापूर तालुक्यात ९,८५०, शहादा तालुक्यात ५९ हजार ४४, तळोदा तालुक्यात १,२३०, अक्कलकुवा तालुक्यात २६,६९४, तर धडगाव तालुक्यात २८,७७८ लोकसंख्येचा समावेश होता. एवढ्या लोकसंख्येला पाणीटंचाई निवारणार्थ एक कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांच्या उपाययोजना कामांचा समावेश होता.

तात्पुरत्या नळपाणी योजना नाहीत

मोठ्या गावांना पाणीटंचाईची झळ बसली नसल्याने दरवेळी घेतल्या जाणाऱ्या तात्पुरत्या पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, शेवड्या व बुडक्या करणे आदी कामे घेण्यात आली नाहीत. केवळ विंधन विहीर घेणे व खासगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यावर भर देण्यात आला होता.

कामे अर्ध्यावर सोडू नयेत

पावसाळा लागला म्हणून टंचाई निवारणाची कामे अर्ध्यावर सोडू नयेत, अशी मागणी होत आहे. दुर्गम भागातील अनेक विंधन विहिरींवर अद्यापही हातपंप बसविण्यात आलेले नाहीत. कोरोना व लॉकडाऊन काळात साहित्य उपलब्ध न होणे, मजूर न मिळणे यामुळे ही कामे रेंगाळली होती. आता ती कामे सुरू झाली असली तरी पावसाळा लागला म्हणून ती न करण्याकडेच अधिक कल असतो. तसे न होता झालेल्या सर्व विंधन विहिरींवर हातपंप बसवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Water scarcity relief work is still going on due to corona and lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.