नंदुरबारवासीयांवर पाणी कपातीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:21 IST2018-11-05T13:21:46+5:302018-11-05T13:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील अवघा 41 टक्के पाणीसाठा लक्षात घेता पालिकेने आतापासूनच ...

नंदुरबारवासीयांवर पाणी कपातीचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील अवघा 41 टक्के पाणीसाठा लक्षात घेता पालिकेने आतापासूनच पाणी पुरवठय़ात काटकसर सुरु केली आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येत्या जानेवारीपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्याचे सुतोवाच पालिकेने दिले आहे. यामुळे यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईला काही प्रमाणात सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा अपव्यय टाळून नागरिकांनी पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे.
नंदुरबार शहराला विरचक प्रकल्प आणि आंबेबारा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पात यंदा पाणीसाठा होऊच शकला नाही. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे थोडाफार साठा झाला. परंतु तो 42 ते 43 टक्क्यांवर पोहचलाच नाही. सद्यस्थितीत विरचक प्रकल्पात अवघा 41 टक्के पाणीसाठा आहे. आंबेबारा प्रकल्पात 60 ते 70 टक्के पाणीसाठा आहे. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता शहराला येत्या सहा ते सात महिने पुरेल इतके पाणी आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवन आणि जमिनीत जिरण्याचे प्रमाण पहाता पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी आतापासूनच पाणी बचतीसाठी उपाययोजना केल्या नाही तर पुढील काळात गंभीर संकट उभे ठाकणार आहे.
एकदिवसाआड पाणी
सध्या नंदुरबारकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पूर्वी पुर्ण एक तास पाणी पुरवठा होत होता. परंतु आता त्यात कपात करण्यात आली असून 45 ते 50 मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. येत्या काळात त्यात आणखी कपात होण्याची शक्यता पालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती असतांना नंदुरबार पालिकेने कधीही आपल्या पाणी पुरवठय़ात खंड पडू दिला नव्हता.
यंदा देखील तसा खंड पडू नये यासाठी पालिका प्रयत्नशील असली तरी त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक राहणार आहे.
दोन दिवसाआडचा निर्णय
सध्या वेळेवर आणि वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याची किंमत नाही. मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. आपले पाणी भरल्यागेल्यानंतर रस्त्यांवर पाणी शिंपडणे, अंगण, ओटे, वाहने धुणे असे प्रकार नागरिक करीत असतात. याशिवाय अनेक भागातील सार्वजनिक नळांना देखील तोटय़ा नसल्यामुळे ते पाणी वाया जाते.
काही नागरिकांनी अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेले आहे या सर्व प्रकारामुळे दररोज किमान एकुण पाणी पुरवठय़ाचा पाच टक्के पाणी वाया जात असल्याचे निरिक्षण पालिकेने केले आहे. हे वाया जाणारे पाणी टाळले गेले नाही तर जानेवारीपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका घेणार आहे.
मिटरप्रमाणे पाणी
पालिकेने अनेक शासकीय कार्यालये, रुग्णालय यांना मिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला आहे. शहरातील नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता मिटरप्रमाणे पाणी दिलेल्या शासकीय कार्यालये आणि इतरांबाबत पालिकेला फेरविचार करणे भाग आहे. त्यादृष्टीनेही पालिकेने कामाला सुरुवात केली आहे. किमान पाणी टंचाईच्या काळात शहरवासीयांचे हित पहाणे महत्त्वाचे आहे.
शहरातील अनेक भागात अवैध नळ कनेक्शन देखील अनेकांनी घेतले आहेत. असे नळ कनेक्शन शोधण्याचे पालिकेपुढे आव्हान आहे. त्यामुळे अशा नळधारकांना 15 नोव्हेंबर्पयत नळकनेक्शन वैध करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शहरात अनेक भागात कुपनलिका देखील आहेत. त्याद्वारे देखील पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक भागात एकदिवसाआड जलकुंभाद्वारे तर एक दिवसाआड कुपनलिकेचे पाणी येते. परिणामी अशा भागात दररोज पाणीपुरवठा होतो. आता कुपनलिकांचे पाणी बंद करून ते उन्हाळ्यात वापरल्यास मदतच होणार आहे.