शहरात फिरा, दोन हजार रुपये भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:00 PM2020-04-09T12:00:51+5:302020-04-09T12:07:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंगळवारी आठवडे बाजार भरला नसला तरी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंगळवारी आठवडे बाजार भरला नसला तरी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ही बाब लक्षात घेता बुधवारी सकाळपासूनच शहर, उपनगर व वाहतूक पोलिसांनी मोहिम राबवून विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांवर चांगलीच वक्रदृष्टी केली. चार तासात १६० पेक्षा अधीक दुचाकी जप्त करण्यात आल्या. प्रत्येक दुचाकीस किमान हजार ते दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. यामुळे सकाळी ११ वाजेनंतर शहरात सन्नाटा निर्माण झाला होता.
मंगळवारी नंदुरबार व शहादा येथे आठवडे बाजार असतो. परंतु सध्या आठवडे बाजार बंद असला तरी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. ही बाब लक्षात घेता खरेदीदारांची देखील गर्दी झाली होती. परिणामी नंदुरबारातील मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे आठवडे बाजाराचेच चित्र निर्माण झाले होते.
संचारबंदी आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले होते. ही बाब लक्षात घेता बुधवारी पोलीस विभागाने सक्तीने वागत वाहनचालकांवर वक्रदृष्टी दाखविली. सकाळी नऊ वाजेपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
अक्षीक्षक, अपर अधीक्षक उतरले रस्त्यावर
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. गांधी पुतळा चौकात त्यांच्यासोबत उपअधीक्षक रमेश पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी चार बाजूंनी रस्ते येतात. त्यामुळे विनाकारण दुचाकींवर फिरणाºयांना अटकाव करण्यात आला. कुठलेही ठोस कारण नसलेल्या दुचाकीस्वारांना कारवाईला सामोरे जावे लागले. सकाळी ९ ते ११ या वेळेत या ठिकाणाहून तब्बल १६० पेक्षा अधीक दुचाकी जप्त करण्यात आल्या.
गांधी पुतळासह नेहरू चौक, पालिका चौक या भागात देखील ही कारवाई करण्यात आली.
वाहने ठेवण्यास जागा अपुरी
जमा केलेली सर्व वाहने ही शहर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने वाहने जप्त करण्यात आल्याने हा परिसर वाहनांमुळे पुर्ण भरला होता. त्यामुळे आणखी इतर वाहने ठेवण्यास जागा अपुरी पडत होती. त्यामुळे इतर ठिकाणी जप्त केलेली वाहने ठेवावी लागत होती.
वाहनांवर तारीख व नंबर
जप्त केलेल्या वाहनांवर जप्त केलेला दिवसाची तारीख व जप्त केलेला नंबर टाकण्यात आला आहे. वाहन मालक वाहन घेण्यासाठी आल्यावर त्याला वाहतूक पोलीस विभागातर्फे कागदपत्रांच्या पुर्ततेवरून तसेच नियमांचे उल्लंघन केल्यावरून किमान एक हजार ते दोन हजार रुपये दंड आकारणी केली जात आहे. यामुळे वाहतूक शाखेच्या दंड वसुलीत मोठी भर पडत आहे.
लॉकडाऊनच आणि संचारबंदीच्या नियमांची जनजागृती करून, कायद्याचा धाक दाखवून, पेट्रोलपंप बंद करून देखील वाहनचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील तर वक्रदृष्टी दाखवावीच लागणार अशी प्रतिक्रिया अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. घरात राहून ही साखळी तोडणे महत्त्वाचे आहे. १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केलेली आहे. तिचे तंतोतंत पालन होणे अपेक्षीत आहे. परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील तर कारवाईचा दंडुका उगारावा लागणार आहे. शहरात विनाकारण फिरणाºयांनी आता तरी स्वत: शिस्त पाळण्यासाठी पुढे यावे. विनाकारण प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू नका असे आवाहनही अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.
कारवाई करतांना अनेकजण विविध कारणे सांगत होते. काहीजण पोलिसांशी हुज्जत देखील घालत होते. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांकडून त्यांना चांगली वागणूक देत समजविण्याचा प्रयत्न केला जात होता. नंतर मात्र संबधितांकडून अती झाल्यावर दंडुक्याचा प्रसाद दिला जात होता. अनेकांना दंडुके खावे लागत होते.
आता १४ एप्रिलपर्यंत दररोज अशा पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यक असेल तरच बाहेर निघा. खरोखर जीवनावश्यक वस्तूंची खरेदीची गरज असेल तर आपल्या परिसरातील जवळच्या दुकानावरून खरेदी करा. मुख्य बाजारपेठेत येवून खरेदी करावी ही मानसिकता सोडावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.