बिलाडी येथे अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:09+5:302021-02-05T08:09:09+5:30

सारंगखेडा परिसरातील कहाटूळ गावात गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिसाराची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. यातून गावातील अनेकांना बाधा झाली होती. ...

The villagers were disturbed due to unhygienic conditions at Biladi | बिलाडी येथे अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ झाले हैराण

बिलाडी येथे अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ झाले हैराण

सारंगखेडा परिसरातील कहाटूळ गावात गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिसाराची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. यातून गावातील अनेकांना बाधा झाली होती. यानंतर तालुक्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, आसपासच्या गावांमध्येही सारखीच स्थिती असल्याचे चित्र आहे. बिलाडी येथे ग्रामसेवकाची नियुक्ती करून ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. परंतु, संबंधित ग्रामसेवक हे गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावातील बऱ्याच ठिकाणी पाइपलाइन लिकेज व पाण्याच्या टाकीजवळच पाणीपुरवठा करणारे व्हॉल्व्ह लीक असल्याने गटारी तुडुंब भरल्या असल्याचे दिसून येत आहे. यातून गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे ही स्थिती असताना लगतच्या बामखेडा तर्फे सारंगखेडा या गावात कोरोनाचे ४७ रुग्ण आढळूल आले होते. यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. या गावात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना साथीच्या आजारांची भीतीही वाढली आहे.

बिलाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गावातील गल्लोगल्ली अस्वच्छता असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. गावात शुद्ध पाणीपुरवठा घरपोच व्हावा, यासाठी प्रशासनाने सुसज्ज अशी पाण्याची टाकी व दोन बोअरवेल घेण्यात आल्या आहेत. यातून पिण्याचे पाणी साठा करून ठेवणारा जलकुंभ स्वच्छ करण्याबाबत कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. जलशुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरचा साठाही नियमितपणे वापरात आणला जात नाही. जलवाहिन्या पूर्णपणे निकामी झाल्या असल्याने निम्मे गाव हे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहते. एक हजार ५८७ लोकवस्तीचे गाव असलेल्या बिलाडी गावाकडे तालुका प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याठिकाणी नियुक्त ग्रामसेवक हे आठवड्यातून एखाद-दुस-या दिवशी येऊन वेळ मारून नेत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन, वित्त आयोगांतर्गत होणारी कामे यांनाही खो दिला जात असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे. यात अनेकांना योजनांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. परंतु, ग्रामसेवकाकडून दाखले मिळत नसल्याने त्यांना शेतीकामे सोडून शहाद्यात जावे लागत आहे.

Web Title: The villagers were disturbed due to unhygienic conditions at Biladi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.