खड्ड्यांमुळे वाहनांचे होतेय नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:06 IST2020-02-18T12:04:29+5:302020-02-18T12:06:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : नेत्रंग शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून रत्यावर महाकाय खड्डे पडले आहे. हे खड्डे ...

खड्ड्यांमुळे वाहनांचे होतेय नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : नेत्रंग शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून रत्यावर महाकाय खड्डे पडले आहे. हे खड्डे वाहनधारकांना टाळणे अशक्य होत असून जड व अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांना या महाकाय खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो. अशाच एका खड्ड्यातून मार्गक्रमण करीत असतांना एका ट्रकचा पाटा तुटला व ट्रक त्याच खड्ड्यातच अडकला.
आंतरराज्य वाहतुकीसाठी सोयीच्या जीजे १२ बीवाय २०२३ हा ट्रक कापूस भरून कर्नाटक राज्यातील देवलीया येथून गुजरात राज्यातील कढी येथे जात होता. हा वाण्याविहिर ते अक्कलकुवा दरम्यान असणाऱ्या पिंप्रिपाडा फाट्याजवळील खड्ड्यांचा अंदाज घेत ट्रक चालकाने ट्रक हळूवार खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक चालकाचा हा प्रयत्न फसला व ट्रकची मागची चाके खड्ड्यात आदळला गेला. त्यामुळे ट्रकचा पाटा तुटला व ट्रक एका बाजूला झुकला आहे. या प्रकारामुळे क्षणभर नेमके काय घडले हेच वाहनचालकाच्या लक्षात आले नाही. जेव्हा हा प्रकार वाहनचालक व सहचालकाच्या लक्षात आला तेव्हा नेमके हसावे की रडावे, अशी द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. चालकाने ट्रक मागे-पुढे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश आले. अधिक प्रयत्न केला तर ट्रक पलटण्याची शक्यता असल्याने ट्रक तेथेच थांबवला.
दरम्यान, नेत्रंग- शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाकाय खड्ड्यामुळे जड-अवजड वाहने ट्रक, ट्राला यांचे पाटा तुटणे व अन्य स्पेअरपार्ट निकामी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तळोदा ते खापर दरम्यान दररोज अश्या प्रकारचे लहान मोठे चार ते पाच नादुरुस्त होऊन उभे असलेले दिसून येतात. या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. त्यामुळे रस्ता प्राधिकरण्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.