अतिदुर्गम भागात ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा अनोखा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:44+5:302021-05-19T04:31:44+5:30
नंदुरबार : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या उत्थानासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात असून, अशाच उपक्रमातून ...

अतिदुर्गम भागात ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा अनोखा प्रयोग
नंदुरबार : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या उत्थानासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात असून, अशाच उपक्रमातून सुरू झालेला ‘ट्रेलिस व्हेजिटेबल’चा प्रयोग यशस्वी झाला असून त्यातून १०० शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. या प्रयोगांतर्गत पाच गुंठे जागेत एक आगळ्या पद्धतीने सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती ही शेतीसाठी प्रतिकूल आहे. डोंगर-उताराची जमीन त्यातच सिंचनाचा अभावामुळे या भागातील आदिवासींकडे पारंपरिक शेती असली तरी त्यांच्यासाठी समृद्धीचा मार्ग फार लांब राहिला आहे. या आदिवासींना मुख्य प्रवाहाशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तेथील शेती समृद्ध करून आदिवासी उत्थानासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. विशेषत: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशनअंतर्गत ग्रामसमृद्धी प्रकल्पातून बायफ संस्थेच्या संयोजनाने राबविण्यात येणारा ‘ट्रेलिस बेस व्हेजिटेबल्स ॲण्ड टँक नी ड्रीप सिस्टिम’ अंतर्गत १०० शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याअंतर्गत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात १६ गावांची निवड करून तेथील १०० शेतकरी निवडण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांकडे असलेल्या पाच गुंठे जागेत वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी मंडप तयार करण्यात आला आहे. तेथे ‘सातपुडा पॅटर्न’ची अनोखी सिंचन व्यवस्था पहायला मिळते. त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर एक हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. या टाकीतून ड्रीप करण्यात आले आहे. साध्या नळ्या लावून आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून ही ड्रीप करण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीत संबंधित शेतकरी जवळपासच्या ठिकाणाहून पाणी आणून ती भरतात. बहुतांश शेतकरी गाढवावरून पाणी वाहून टाकीत भरतात. या पाण्याच्या टाकीतून ड्रीपद्वारे लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याला ते पाणी देतात.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी गिलकी, कारले आणि दुधीभोपळ्याची लागवड केली आहे. ही योजना बायफच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी राबवीत आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला साधारणत: ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मंडपात संबंधित शेतकरी १० वर्षांपर्यंत भाजीपाल्याचे पीक घेऊ शकणार आहेत.
निवड झालेली गावे
या प्रकल्पाअंतर्गत धडगाव तालुक्यातील काकर्दा, चोंदवाडे, धमाके, हरणखुरी, शेलकुई, खरवड, उमराणी, बिहरी तर अक्कलकुवा तालुक्यातील काठी, भगदरी, बेडाकुंड, जमाना, वेली, बिजरीगव्हाण, बर्डी, भांग्रापाणी या गावांची निवड करण्यात आली असून या गावांमधील १०० शेतकरी ही योजना राबवीत आहेत.
ही योजना चांगली असून त्यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. जानेवारी महिन्यात आम्ही भाजीपाल्याची लागवड केली होती. आता त्याचे उत्पन्न सुरू झाले असून लॉकडाऊनमुळे याच भागात रस्त्यावर बसून भाजीपाला विकला जात आहे. आपल्याला सुमारे २५ हजारांचे उत्पन्न मिळाले. पुन्हा ऑगस्टमध्ये लागवड करणार आहोत.
-तिरसिंग इजमल पावरा, चोंदवाडे, ता.धडगाव