शहरातून परत आलेल्या बेरोजगार तरुणांचा कल शेतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:43+5:302021-05-13T04:30:43+5:30
कोरोना महामारीने दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कहर केला असून, चालू झालेले उद्योगधंदे - व्यापार शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बंद करावे ...

शहरातून परत आलेल्या बेरोजगार तरुणांचा कल शेतीकडे
कोरोना महामारीने दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात कहर केला असून, चालू झालेले उद्योगधंदे - व्यापार शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बंद करावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागातून गेलेले अनेक डिप्लोमाधारक, आयटीआयधारक, पदवीधारक तरुण लॉकडाऊन कधी उघडणार, याची वाट न पाहता घरी परतले आहेत. कारण शहरी भागात महागडे रूम भाडे, वीजबिल भरून आर्थिक टंचाईला सामोरे जाण्यापेक्षा तरुण परत आपापल्या गावी परतले आहेत.
कोरोनामुळे सगळीकडे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम शहरांमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तसेच छोटे - मोठे उद्योग - धंदे करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांवर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जवळ - जवळ सर्व तरुण आपल्या कुटुंबासह आपल्या गावी परतले आहेत. गावी परतल्यावर घरी बसण्यापेक्षा ते सध्या आपल्या वडिलोपार्जित थोड्याफार शेतीत घरच्यांना हातभार लावत आहेत. तसेच ज्या तरुणांकडे शेती नाही, असे तरुण रोजंदारीने सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे चालू असून, तेथे जातांना दिसत आहेत. शेतीतही सध्या पाणी मुबलक असले तरी लॉकडाऊमुळे सर्वच पिकांना भाव नसल्यामुळे सद्यस्थितीत शेती करणेही परवडत नाही. मात्र, या बेरोजगार तरुणांना सध्या शेतीशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी दिसून येत नाही.