मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत १६ कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:58 IST2020-01-20T14:57:50+5:302020-01-20T14:58:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १६ कोटी १६ लाख प्रस्तावीत प्रकल्पांच्या गुंतवणुकीस मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत १६ कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : १६ कोटी १६ लाख प्रस्तावीत प्रकल्पांच्या गुंतवणुकीस मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यबल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. समितीची बैठक नुकतीच झाली.
या बैठकीस प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रविंद्र अकोले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, समाज कल्याण निरीक्षक एस. के. गांगुर्डे, सुभाष चंद्रसिंग गिरासे आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय समितीने एकूण रुपये १६ कोटी १६ लाख एवढ्या प्रस्तावित गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी देऊन संबंधित बँकांकडे शिफारस केली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात १०६ उत्पादन व सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून १४ कोटी २९ लाख एवढी नवीन भांडवली गुंतवणूक प्रस्तावित आहे. यामुळे ५०० युवकांना रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योग व व्यवसाय करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाते. निर्मिती क्षेत्रासाठी जास्तीत जास्त ५० लाख व सेवा क्षेत्रासाठी जास्तीत जास्त १० लाख एवढ्या गुंतवणूकीचे प्रकल्प पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सामाजिक वर्गवारी व ग्रामीण व शहरी वर्गवारीनुसार कमीत कमी १५ टक्के ते जास्तीत जास्त ३५ टक्के अनुदान बँक कर्जाशी निगडीत स्वरुपात देण्यात येते. यामध्ये लाभार्थ्यांचा किमान हिस्सा पाच ते दहा टक्के एवढा आहे.
ग्रामीण व शहरी भागामध्ये स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, बेरोजगार युवकांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. योजनेसाठी जिल्ह्यातील गरजू लोकांनी व सुशिक्षित बेरोजगारांनी जास्तीत जास्त प्रमाणावर अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी केले आहे.
ही योजना संपूर्णपणे आॅनलाईन स्वरुपात राबविण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत आॅनलाईन अर्ज करण्यासाठी व माहिती देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार या कार्यालयात सीएमईजीपी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी व आॅनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार या कार्यालयांशी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.