पावसाळ्यात वीज गुल होण्याचे प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:37+5:302021-06-23T04:20:37+5:30

बामखेडा : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वाराही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण ...

The types of power outages increased during the rainy season | पावसाळ्यात वीज गुल होण्याचे प्रकार वाढले

पावसाळ्यात वीज गुल होण्याचे प्रकार वाढले

बामखेडा : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वाराही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण कंपनीकडून ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वादळी वारा किंवा विजांचा कडकडात असताना वीज गेली तर ते ठीक आहे; परंतु साधा वारा किंवा पावसाचे थेंबही सुरू झाले तरी वीज गुल होत असल्याने ग्राहकांत त्यांच्याप्रती प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचे पहिले एक-दोन आठवडे उन्हाच्या झळांसोबतच कधीतरी पावसाच्या सरी कोसळत असतात. त्यामुळे अतिप्रमाणात उकाडा होत असल्याने जनता घामाघूम होत असून, पंख्याचा किंवा कूलरचा आसरा घेण्याच्या स्थितीत असताना, शक्यतो ग्रामीण भागात विजेचे अघोषित भारनियमन करण्याचे प्रकार हे कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा या प्रकारामुळे जनता त्रस्त झाली असून, याच वेळेस हे प्रकार हा होतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेही पावसाळ्यापूर्वी प्री-मान्सून कामे ज्यात तारेवरील झाडे तोडणे, फांद्या छाटणे, जीर्ण तारा बदलणे किंवा इतर तांत्रिक बाबींतून कामे आटोपली असली तरी वादळी वारा नसतानाही वीजपुरवठा खंडित होताेच कसा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या महिनाभरापासून तर ग्रामीण भागात दिवसभरातून एक-दीड तास वीज गायब होत आहे. संध्याकाळी व रात्रीही असाच प्रकार सुरू असल्यामुळे वीज ग्राहक सध्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

लोड डिव्हाइड केला नसल्याने फ्युज उडण्याचे प्रकार वाढले

ग्रामीण भागातील अनेक गावांत विद्युत रोहित्र कमी व ग्राहक जास्त असल्याने फ्युज अधिक भार सोसत नाही. तसेच कमी किंवा उच्च दाबाच्या प्रवाहामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कूपनलिका, विहिरीतील मोटर व पंप नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहेत.

बत्ती गुल मीटर चालू...

सुविधा कमी वसुलीला प्राधान्य जास्त, असा फंडा विद्युत वितरण कंपनीचा आहे. सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र महिना संपत नाही तोच वीजबिल वसुलीसाठी येणारे संबंधित लाईनमन वीज तोडण्याची धमकी देऊन बिलांची वसुली करीत आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

रात्रपाळीच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाल्यास शेतात पाणी देण्यासाठी मजूर लावला असेल तर शेतकऱ्यांना मजुरीचा भार सोसावा लागत आहे. हा प्रकार महिन्यातून बहुतांश वेळा शेतकऱ्यांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांंना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

Web Title: The types of power outages increased during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.