जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थी लागले एमपीएससीच्या तयारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:41+5:302021-03-13T04:56:41+5:30
नंदुरबार : राज्य शासनाने २१ मार्च रोजी एमपीएसी पूर्वपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातून परीक्षा देणाऱ्या २ हजार ...

जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थी लागले एमपीएससीच्या तयारीला
नंदुरबार : राज्य शासनाने २१ मार्च रोजी एमपीएसी पूर्वपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातून परीक्षा देणाऱ्या २ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यानुसार विद्यार्थी तयारीला लागले असून गुरुवारी पूर्वपरीक्षा घेण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील परीक्षार्थिंनी आंदोलन केले होते.
शासनाकडून वेळोवेळी काेरोनाची कारणे दाखवत एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली होती. यातून अभ्यास करून वर्षभर तयारी करणाऱ्या परीक्षार्थिंना धक्का बसला होता. वाढते वय आणि नोकरीची गरज यामुळे अनेक परीक्षार्थी बेचैन झाले होते. अभ्यास करूनही परीक्षा होत नसल्याने अनेकांचे मानसिक स्वास्थ्य खराब होण्याची वेळ आली होती. अभ्यासासाठी केला जाणारा पुस्तकांचा खर्च, ऑनलाईन सत्र तसेच परीक्षा फीची जुळवाजुळव विद्यार्थी तयार होत होते. परंतु, ऐनवेळी रद्द होणाऱ्या परीक्षेमुळे त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. यातून शासनाने १४ मार्च रोजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी नाराज झाले होते. यातून राज्यभर आंदोलन करण्यात आल्यानंतर शासनाकडून येत्या २१ मार्च रोजी पूर्वपरीक्षा घेण्याचे ठरविले आहे. परीक्षा होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे.
१४ मार्च रोजीचे प्रवेशपत्रच धरले जाणार ग्राह्य
येत्या २१ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी रद्द झालेल्या १४ मार्च रोजीचे प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याची शक्यता आहे. एमपीएससीकडून अधिकृतरित्या तशी माहिती दिलेली नसली तरी यानुसारच प्रक्रिया होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऑफलाईन परीक्षा असल्याने प्रशासनाकडून केंद्रांवर केल्या जाणार विविध उपाययोजना
इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नको, असा सवाल करत विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर आले होते. दरम्यान, येत्या २१ मार्च रोजी होणारी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने प्रशासनाकडून कोविड नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
परीक्षेसाठी जिल्ह्यातील नियुक्त केंद्रांपर्यंत येणे सुकर व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांना बसेस व इतर खासगी वाहनांंचा वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यातील परीक्षार्थिंसाठी नियुक्त सर्व सहा केंद्रे ही नंदुरबार शहरातच आहेत.
वर्षभरात पाचव्यांदा रद्द झाली पूर्वपरीक्षा
२०२० मध्ये कोरोनामुळे विविध परीक्षा थांबविण्यात आल्या होत्या. सार्वजनिक वावराबाबतच्या निर्बंधांना शिथिलता दिल्यानंतर गेल्या वर्षात नोव्हेंबरपासून पाचवेळा परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. १४ मार्च रोजीची परीक्षा चार दिवसांआधीच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. सर्वसामान्य विद्यार्थी वर्षभरापासून परीक्षेची तयारी करत होता. त्यात पाचवेळा परीक्षा रद्द करण्यात आल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम होत होता. आता परीक्षा असल्याने विद्यार्थी पुन्हा तयारीला लागले आहेत.
-प्रवीण पाटील,मार्गदर्शक,नंदुरबार.
गेल्या वर्षात कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे वर्षभर तयारीला वेळ मिळाला. नोव्हेंबरपासून परीक्षा होणार असे नियोजन असल्याने त्यादृष्टीने तयारी केली होती. परंतु, वेळोवेळी तारखा लांबल्याने इतर परीक्षांच्या अभ्यासावर परिणाम झाला.
-जयकुमार कणखर, परीक्षार्थी, नंदुरबार.
शासनाने परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. पुन्हा रद्द केले, आता पुन्हा परीक्षा घेणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या हो-नाही च्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तरीही २१ रोजीच्या परीक्षेसाठी तयारीला वेग दिला आहे.
-चंद्रकांत अनारसे,परीक्षार्थी, नंदुरबार.