दोन हजार अंगणवाडींना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठ्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:59+5:302021-09-03T04:31:59+5:30
चार वर्षांपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीजपुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे ...

दोन हजार अंगणवाडींना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठ्याची प्रतीक्षा
चार वर्षांपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीजपुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे आला होता; परंतु अनेक अंगणवाड्या या दुर्गम भागात, डोंगराळ भागात चालतात. अशा ठिकाणी वीजपुरवठा शक्य नसल्यास सौरऊर्जेद्वारा अशा अंगणवाडींना वीजपुरवठा करावा, असे ठरले होते. त्यानुसार तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी तसे आदेशही दिले होते; परंतु मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेकडूनच तसा प्रस्ताव गेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार अंगणवाड्या अंधाराचा सामना करीत आहेत.
जिल्ह्यात दोन हजार ४३४ अंगणवाडी आहेत. त्यापैकी काही अंगणवाडींना वीजपुरवठा केला जातो. काहींनी तो घेतला देखील आहे. चार वर्षांपूर्वी १७ अंगणवाड्यांनी वीजपुरवठ्यासाठी कोटेशन भरलेले होते. सद्य:स्थितीत जवळपास दोन हजार अंगणवाडींना वीजपुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौरऊर्जेवर आधारित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला होता; परंतु नंतर त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
विविध कामे रखडतात
अंगणवाड्यांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषित बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचे सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना संगणक पुरवठा करणे आणि त्या अनुषंगाने वीज जोडणी देणे आवश्यक आहे; परंतु अंगणवाडींकडे एवढा व्याप असतानाही संगणकही दिले गेले नाहीत किंवा वीज जोडणीदेखील अद्यापपर्यंत दिली गेली नाही. सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा झाल्यानंतर संगणक पुरविले जातील, अशी अपेक्षा आहे. कारण सध्या देण्यात आलेल्या टॅबला अनेक अडचणी येत आहेत. संगणक राहिल्यास कामकाज सुटसुटीत होऊ शकते.
शाळांचीही तीच गत
नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकूण एक हजार ३९३ शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार ५३ शाळांना वीजपुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे; परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीजपुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्यादेखील १०० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकूण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.
दुर्गम भागात अधिक
वीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत. अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहोचलेली नाही तेथे शाळेला कुठून वीज मिळेल, असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यांतील ३००, तर इतर तालुक्यांतील ४० शाळांचा समावेश आहे.
सध्या शासनाचा सौरऊर्जेवर सर्वाधिक भर आहे. अनेक गाव व पाड्यांवर सौर दिवे, पथदिवे, सौर पंप पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांनाही सौरऊर्जाद्वारे वीजपुरवठा झाल्यास कर्मचाऱ्यांना संगणकावर अनेक कामे करता येणार आहेत. सध्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्यावर नियमित कामांपेक्षा इतर कामांचाही बोजा वाढला आहे. शिवाय दैनंदिन रिपोर्ट मोबाईल किंवा टॅबद्वारे वरिष्ठांना पाठविण्याची सक्ती आहे. त्यामुळे अडचणी येतात.